पुढारी ऑनलाईन डेस्क : अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणत्याही प्रश्नांवर चर्चा करण्याची विरोधकांची तयारी नाही. सभागृहात चर्चा करण्याची तयारी नाही, केवळ दिशाभूल करण्याचे विरोधकांचे काम सुरू आहे. खोटे नॅरेटिव्ह तयार करून स्वत:ची पाठ विरोधक थोपटू लागले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी दिलेल्या पत्रात नवीन काही नाही. विरोधकांची गिरे तो टांग उपर अशी अवस्था झाली आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ते आज (दि.२६) पत्रकार परिषदेत बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खोटं बोल पण रेटून बोल अशी विरोधकांची मानसिकता झाली आहे. विरोधकांनी आधी आरशात बघावं, आणि आमच्यावर टीका करावी. विदर्भातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले नाहीत, हा विरोधकांचा आरोप खोटा आहे.
खोटे नॅरेटिव्ह पसरविण्याची फॅक्टरी विरोधकांनी उघडली आहे. परंतु, याचा पर्दाफाश आम्ही अधिवेशनात करू, मविआ काळात बंद केलेले प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले आहेत. ८७ प्रकल्प महायुतीने पूर्ण केले आहेत. ड्रग्जच्या विरोधात आम्ही कारवाई सुरू केली आहे. परकिय गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांवर आहे. आमची चर्चेची तयारी आहे. मीडियासमोर बोलण्यापेक्षा विरोधकांनी सभागृहात बोलावे, आम्ही सर्व प्रश्नाची उत्तरे देऊ, असे ते म्हणाले.