मुंबई; पुढारी वृत्तसेवा : इलेक्ट्रिक वाहनांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून राज्यात नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, कोल्हापूर आदी भागांत ४० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. ही कामे सध्या प्रगतीपथावर असून महावितरणला प्राधान्याने वीज पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पर्यावरणाचा -हास रोखण्यासाठी व इंधनाच्या वाढत्या किमतीला पर्याय म्हणून राज्यात इलेक्ट्रिक व्हेईकल धोरण आखण्यात आले आहे. राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने वापरावीत म्हणून आदेश जारी करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १ एप्रिल २०२२ पासून शासकीय वापरासाठी भाडेतत्त्वावर घेण्यात येणारी सर्व वाहने इलेक्ट्रिक असतील, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी मंत्रालयाच्या आवारात चार्जिंग स्टेशनही उभारण्यात आले आहे.
सरकारी ताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या मोजकीच असली तरी खासगी इलेक्ट्रिक वाहने सध्या मंबईच्या रस्त्यावर मोठ्या संख्येने दिसत आहेत. बॅटरीवर चालणाऱ्या पर्यावरणपूरक अशा दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना चांगली पसंती मिळू लागली आहे. या धोरणाचा एक भाग म्हणून राज्यात ४० ठिकाणी अतिरिक्त चार्जिंग स्टेशन उभारण्यात येत आहे.
नवी मुंबई १, ठाणे ६, नाशिक २, संभाजीनगर २, पुणे १७, सोलापूर २, नागपूर ६, कोल्हापूर २, अमरावती २ येथे नव्याने चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू आहे. महावितरणकडून ठाण्यात पाच, नवी मुंबईत ११ पुण्यात पाच, नागपूर अशी अकरा स्टेशन सुरू करण्यात आलेली आहेत.