

Chandrashekhar Bawankule vs Uddhav Thackeray
मुंबई : खंडणीखोरांचे सरदार कोण आहे? हे जनतेला माहिती आहे. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत कोण ‘चिफ मिनिस्टर‘ आहे? आणि कोण ‘ थिफ मिनिस्टर‘ हे देखील महाराष्ट्रातील जनतेनं दाखवून दिलं आहे. सचिन वाझे काय लादेन आहे का? असे म्हणत उद्योगपतींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवून तुमच्या नेतृत्वात शंभर कोटी वसुली सुरू होती, हे जनता विसरली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना जरा आपला भूतकाळ आठवा आणि विचार करून बोला, असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.
ते पुढे म्हणाले की, बाकी इंडी आघाडीत तुमची शेवटच्या रांगेतील किंमत महाराष्ट्रानं बघितली. आजही आपल्याला शेवटच्या रांगेत उभं राहावं लागेल म्हणून तुम्ही दिल्लीतील आंदोलनात गेला नाहीत आणि इथं चार टाळके घेऊन आंदोलन केलं. तिकडं राहुल गांधींचं आंदोलन सुरू असताना आपली वेगळी चूल मांडून तुम्ही लक्ष वेधण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकशाहीचा आणि नैतिकतेचा गळा घोटला होता. आज देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रामाणिक नेतृत्वावर बोट ठेवण्याआधी तुम्ही स्वतःला आरशात पाहायला हवं. फडणवीस यांचं काम हे फक्त भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचं नाही, तर स्थिर, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचं आहे. महाराष्ट्रातील जनतेचा त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला लोकं कंटाळले आहेत, असा टोला बावनकुळे यांनी ठाकरे यांना लगावला.