

मुंबई : मुंबई महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात सामान्य प्रशासन आणि नगर अभियंता विभागातील कर्मचारी व अधिकारी यांची पदोन्नती झाली आहे. परंतु अनेक अभियंते आणि अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारणे आणि नवीन पदाचा पदभार स्विकारण्यास होणारा विलंब यामुळे प्रशासकीय कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
परिणामी, प्रशासनाने कर्मचाऱ्यांनी पदोन्नती नाकारल्यास दोन वर्ष कालावधीकरिता पदोन्नतीपासून अपात्र करण्यात येईल. तसेच पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांत कर्मचाऱ्यांने नवीन पदाचा पदभार स्विकारणे बंधनकारक केले आहे.
मुंबई महानगरपालिकेत ८७ हजारांहून अधिक कर्मचारी, अधिकारी आणि अभियंते काम करतात. या सर्वांची जेष्ठतानुसार पदोन्नती होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून अधिकारी वर्ग पदोन्नतीनंतर मिळालेल्या खात्यामध्ये जात नसल्याचे दिसून येत आहे. तसेच झालेली पदोन्नतीसुद्धा स्विकारत नाही. यामुळे पालिका प्रशासनाने आता अशा कर्मचाऱ्यांना अपात्र ठरविल्याचे आदेश सोमवार, २९ जून २०२६ रोजी महानगरपालिका प्रशासनाने निर्गमित केले आहेत.
पालिका प्रशासनाने काढलेल्या आदेशानुसार, पदोन्नतीआदेश संबंधित विभागास प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभाग प्रमुख अथवा कार्यालय प्रमुख यांनी संबंधित कर्मचाऱ्यास ७ दिवसांच्या आत कार्यमुक्त करणे बंधनकारक आहे. तसे आदेश निर्गमित न केल्यास, तरीही संबंधित कर्मचाऱ्यास दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर स्वतंत्र कार्यमुक्त आदेशाची प्रतीक्षा न करता पदोन्नती आदेशानुसार नवीन पदावर रूजू होता येईल व अशा रूजू होण्यास वैध मानण्यात येईल. तसेच १५ दिवसांच्या कालावधीत नवीन पदाचा पदभार स्विकारला नसल्यास, तर त्याने पदोन्नती स्विकारण्यास नकार दिला आहे, असे मानण्यात येईल.
पदोन्नती नाकारल्यामुळे अपात्र ठरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यास पूर्वी प्राप्त असलेल्या सेवाजेष्ठतेचे संरक्षण मिळणार नाही. अशा कालावधीत पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यास त्याचे कनिष्ठ कर्मचाऱ्याला त्याच्यापेक्षा सेवाजेष्ठ समजले जाईल. व त्यानुसार सेवा जेष्ठता निश्चित करण्यात येईल. एखाद्या कर्मचाऱ्याने विशिष्ट विभाग, कार्यालय अथवा पदावरील बदली टाळण्याच्या उद्देशाने पदोन्नती स्विकारण्यास नकार दिल्याचे निदर्शनास आल्यास, अशा कर्मचाऱ्यास विभागीय पदोन्नती समितीची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या विद्यमान अथवा कार्यालयातून अन्य विभागात अथवा कार्यालयात बदली करण्यात येईल.