

मुंबई: आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे राजकीय करिअर सेट करण्यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून 'जेन-झी'च्या नावाखाली आंदोलन हायजॅक केले जात आहे. नीट परीक्षा, सर्वसामान्य विद्यार्थी आणि तरुणांच्या करिअरशी या दोन्ही पक्षांना आणि त्यांच्या आंदोलनाला काहीही देणे-घेणे नसल्याची टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवारी केली.
पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांच्या देशव्यापी आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने रविवारी तिरंगा विजय जल्लोष केला.
ठाकरे बंधूंच्या या संयुक्त सभेवर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सडकून टीका केली आहे. ठाकरे बंधूंच्या या सभेत कोणताही राजकीय झेंडा नसल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांचा अजेंडा पक्का आहे.
या मोर्चात कोणत्याही पक्षाचा अधिकृत झेंडा दिसत नसला, तरी संजय राऊत तुमचा राजकीय अजेंडा आधीपासूनच ठरलेला आहे. या आंदोलनाचा सर्वसामान्य 'जेन-झी' तरुण, नीट परीक्षेला सामोरे जाणारे विद्यार्थी किंवा त्यांच्या भवितव्याशी काहीही देणे-घेणे नाही.
तुम्हाला फक्त आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे राजकीय करिअर सेट करायचे आहे, असा आरोप नवनाथ बन यांनी केला आहे. तसेच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना या जल्लोष रॅलीत भाषण करण्याची संधी न मिळाल्यावरून नवनाथ बन यांनी उपरोधिक टोला लगावला.
संजय राऊत, जर या आंदोलनात कोणताही छुपा राजकीय अजेंडा नव्हता, तर मग तुम्हाला या रॅलीत भाषण का करू दिले गेले नाही? असा सवाल त्यांनी केला. तसेच, तुम्ही या मंचावर बोलला असतात तर तिथेही तुम्ही राहुल गांधींचा उदोउदो केला असता, त्यांचे कौतुक केले असते आणि या आंदोलनाचे सर्व श्रेय राहुल गांधींच्या पदरात पाडले असते. म्हणूनच ठाकरे बंधूंनी तुम्हाला या आंदोलनात बोलू दिले नाही, असा दावा नवनाथ बन यांनी केला.