

BMC Elections 2025 Bjp Shiv Sena Alliance
मुंबई : नरेश कदम
बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली असून मित्रपक्ष बॅकफूटवर गेले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे राज्यातील नेत्यांचे लक्ष लागले होते. बिहार विधानसभेचा निकाल भाजपच्या विरोधात गेला असता तर सत्तारूढ महायुतीतले शिंदे गट आणि अजित पवार गट यांची महापालिका निवडणुकीत जागांची मागणी वाढली असती. मात्र बिहारमध्ये अनपेक्षित यश भाजपला मिळाल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे.
मुंबई महापालिकेत भाजपने शिंदे गटासह लढण्याचे ठरविले आहे. पण 227 जागांपैकी 100 हून अधिक जागांची मागणी शिंदे गटाने भाजपकडे केली आहे. पण भाजप 80 पेक्षा जास्त जागा शिंदे गटाला देण्यास तयार नाही. 100 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला गळ घातली होती. मात्र आता बिहारच्या विजयामुळे भाजपला मुंबई प्रदेशमधील महापालिकांमध्ये उत्तर भारतीयांची मते निर्णायक आहेत. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपला ही मते खेचणे आता अधिक सोपे झाले आहे.
गुजराती, जैन मारवाडी, उत्तर भारतीयांचे प्राबल्य असलेले वॉर्ड भाजप स्वतःकडे ठेवणार आहेच पण मराठी बहुल भागातील वॉर्ड भाजप लढविणार आहे. भाजपच्या सर्व्हेत ज्या वॉर्डात शिंदे गट जिंकण्याची शक्यता आहे ते वॉर्ड शिंदे गटाला दिले जातील.
ठाण्यात शिंदे गटासोबत युती करण्यास भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा विरोध आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका स्वबळावर लढण्याची अजित पवार यांची तयारी आहे. पण पार्थ पवार यांचे जमीन घोटाळा आणि बिहारमधील विजय यामुळे अजित पवार बॅकफूटवर आले आहेत. जागावाटपात अजित पवारांवर भाजपचे नेतृत्व दबाव टाकू शकते.
महायुतीतील मित्रपक्ष नगरपालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये काही ठिकाणी वेगळे लढले तरी भाजप स्थानिक स्वराज्य निवडणुकीत एक नंबरचा पक्ष असला पाहिजे अशी भाजपची रणनीती आहे. नगरपालिका असोत किंवा महापालिका व जिल्हा परिषद यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष घालत आहेत.