

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भांडुपमध्ये हर्ष तुषार ठाकूर या 23 वर्षीय तरुणाची त्याच्या परिचित तरुणाने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. या हत्येचा 36 तासांत पर्दाफाश करून कांजूरमार्ग पोलिसांनी पळून गेलेल्या रोहित कचरु खरात या आरोपीस जालना येथून अटक केली. याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही घटना शनिवारी रात्री सव्वाच्या सुमारास भांडुप येथील मेनन कॉलेजवळील नाल्याजवळ घडली. हर्ष हा नाहूर येथे राहत असून शनिवारी रात्री हर्ष हा त्याचे मित्र ओमकार आणि नितीनसोबत मेनन कॉलेजवळील नाल्याजवळ गप्पा मारत होते. यावेळी त्याचा रोहितशी क्षुल्लक कारणावरुन वाद झाला.
या वादानंतर त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्याचा राग आल्याने रोहितने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने हर्षवर प्राणघातक हल्ला केला. त्यात त्याच्या छातीला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर रोहित तेथून पळून गेला होता. रक्तबंबाळ झालेल्या हर्षला त्याच्या मित्रांनी तातडीने जवळच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
रागाच्या भरात झाली हत्या
याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या रोहितला कांजूरमार्ग पोलिसांनी जालन्याच्या बदनापूर येथून अटक केली. चौकशीत त्याने अचानक झालेल्या भांडणाचा राग अनावर झाल्याने हर्षची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याचे सांगितले. त्याची हत्या करण्याचा आपला उद्देश नव्हता. मात्र रागावर नियंत्रण न राहिल्याने त्याच्या हातून हर्षची हत्या झाल्याचे त्याने सांगितले.