मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गोध्रा जळीतकांडानंतर गुजरातमधील बेस्ट बेकरीच्या आवारात घडलेल्या १४ जणांच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर गेला आहे. हत्याकांडात सहभाग असल्याच्या आरोपाखाली गेली १० वर्षे तुरुंगात असलेल्या दोघा आरोपींचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने राखून ठेवला हा निर्णय गुरूवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप निकालपत्र पूर्ण झाले नसल्याने सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी निकालाची सुनावणी २५ मेपर्यंत तहकूब ठेवली.
१ मार्च २००२ रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर संतप्त जमावाने हल्ला केला. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली. जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात असून गुरूवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.