बेस्ट बेकरी हत्याकांड : निकाल लांबणीवर

बेस्ट बेकरी हत्याकांड : निकाल लांबणीवर
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : गोध्रा जळीतकांडानंतर गुजरातमधील बेस्ट बेकरीच्या आवारात घडलेल्या १४ जणांच्या हत्याकांडाच्या खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर गेला आहे. हत्याकांडात सहभाग असल्याच्या आरोपाखाली गेली १० वर्षे तुरुंगात असलेल्या दोघा आरोपींचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने राखून ठेवला हा निर्णय गुरूवारी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप निकालपत्र पूर्ण झाले नसल्याने सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी निकालाची सुनावणी २५  मेपर्यंत तहकूब ठेवली.

१ मार्च २००२ रोजी वडोदरा येथील हनुमान टेकडीवरील बेस्ट बेकरीवर संतप्त जमावाने हल्ला केला. गोध्रा येथे साबरमती एक्स्प्रेस जाळल्यानंतर ही घटना घडली. जमावामध्ये हर्षद सोलंकी व मफत गोहिल या दोघांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. हे दोघे सध्या आर्थर रोड तुरुंगात असून गुरूवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

  • सत्र न्यायालयात एकूण चार आरोपीविरुद्ध खटला उभा राहिला होता. मात्र दोघा आरोपींचा मृत्यू झाला. सोलंकी व गोहिलविरुद्ध सरकारी पक्षाने एकूण १० साक्षीदार तपासले. हे दोघे दोषी की निर्दोष, याचा अंतिम फैसला मुंबई सत्र न्यायालय देणार आहे. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने १७ जानेवारीला निकाल राखून ठेवला होता. मात्र उच्च न्यायालयाने कालमर्यादा आखून दिलेल्या प्रकरणांच्या सुनावणीमध्ये सत्र न्यायालय व्यस्त असल्याने बेस्ट बेकरी खटल्याचा निकाल लांबणीवर पडला. बेस्ट बेकरी हत्याकांड घडून तब्बल २१ वर्षे उलटल्यानंतर २ आरोपींच्या सहभागाबाबत न्यायालय फैसला करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news