

मुंबई: मुंबईत तीन ठिकाणी सुरू असलेल्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या रहिवाशांना तात्पुरत्या स्थलांतरांसाठी २५ हजार रुपये भाडे दिले जात होते. आता त्यात ५ हजारांची वाढ करण्यात आली आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून वरळी, ना. म. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास मार्गी लावला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत १५ हजारांहून अधिक बीडीडीवासीयांचे पुनर्वसन करून त्यांना ५०० चौरस फुटाची घरे दिली जाणार आहेत. ज्या इमारतींची कामे पूर्ण झाली आहेत तेथील रहिवाशांना ताबा देण्यात आला आहे.
पुनर्विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांना गती देण्यासाठी रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करून इमारती रिकाम्या करणे आवश्यक आहे. मात्र, मुंबई मंडळाकडे सध्या रहिवाशांच्या स्थलांतरासाठी संक्रमण शिबिरांतील गाळे अपुरे पडत आहेत.
यावर तोडगा म्हणून रहिवाशांना घरभाड्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयानुसार रहिवाशांना दरमहा २५ हजार रुपये घरभाडे दिले जात होते. मात्र त्यात वाढ करण्याची मागणी रहिवासी करत होते. ही मागणी मान्य झाली असून ऑगस्टपासून दरमहा ३० हजार रुपये भाडे दिले जाणार आहे.