

मुंबई: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात चाळी रिकाम्या करताना काही कुटुंबे अनधिकृतपणे वास्तव्यास असलेली आढळली आहेत. चाळींतील न्हाणीगृहात वर्षानुवर्षे या कुटुंबांचे वास्तव्य आहे. अशा दोन कुटुंबांचा समावेश बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील चाळ क्रमांक १८ रिक्त करण्यात आली त्यावेळी पहिल्या मजल्यावरील मध्यवर्ती न्हाणीगृहामध्ये मालन बडेकर वास्तव्यास अनधिकृतपणे होत्या. त्यांना पुनर्विकास प्रकल्पांतर्गत घर मिळवण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले.
त्यामुळे बडेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयीन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि म्हाडाचे प्रतिनिधी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार याचिकाकर्त्या ही जागा १९८५पासून गेली ४० वर्षे निवासी कारणासाठी वापरत असल्याचा निष्कर्ष निघाला. यानुसार बडेकर यांना पुनर्विकास प्रकल्पासाठी पात्र ठरवण्यात आले आहे.
बडेकर यांच्या उदाहरणाचा आधार घेऊन जयश्री बनसोडे यांनीही पुनर्विकसित सदनिकेसाठी आपल्याला पात्र ठरवण्याची विनंती केली होती. त्या चाळ क्रमांक ६१मध्ये तळमजल्यावरील न्हाणीगृहात वास्तव्यास होत्या.
बनसोडे यांच्या दाव्यानुसार त्या स्वत: १९९४पासून व त्यांचे वडील १९२४ सालापासून येथे वास्तव्यास आहेत. मात्र १९९४ सालचे पुरावे त्यांना सादर करता आले नाहीत. त्यामुळे बनसोडे या अपात्र ठरत आहेत.
परंतु, १ जानेवारी २००० पूर्वीच्या सर्व निवासी संरचनांचा झोपडीधारक म्हणून या प्रकल्पात समावेश करण्यात येत असल्याने बनसोडे या २५ चौरस मीटरच्या सदनिकेसाठी पात्र ठरल्या आहेत.
आता बीडीडी चाळींच्या न्हाणी घरात राहिलेल्या कुटुंबांचेही भाग्य उजाडल्याने सर्व रहिवाशी आता टॉवरमध्ये एकत्र आलेले दिसतील, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. हा एकूणच प्रकल्प या अर्थाने चर्चेचा विषय झाला आहे.