

Bandra Accident News
मुंबई : मोबाईलवर बोलत कार चालवणाऱ्या महिलेमुळे मुंबईत शेंगदाणे विकणाऱ्या पित्याने आठ वर्षांच्या मुलाला गमावलं आहे. दुर्दैव म्हणजे 1 सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या अगोदरच मुलाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
रविवारी दुपारी २.१५ ते २.३०च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे अंश रवींद्र गुप्ता (८) हा मुलगा रस्ता ओंलाडत होता. यादरम्यान इनोव्हा क्रिस्टा कारमधून जाणाऱ्या मेघा रावल (४५) हिने अंशला धडक देऊन त्याच्या अंगावरून वाहन नेल्याची धक्कादायक घटना घडली.
धडकेनंतर कार त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर त्याला तातडीने होली फॅमिली रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची नोंद करून महिला चालक मेघा रावल हिच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८४३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, २८१, १२५ सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मेघाला अटक केली असून ती फिटनेस कॉच असल्याचे समजते.
अंशचे वडील हे वांद्रे बँडस्टँड भागात शेंगदाणे विकतात. लग्नाच्या 15 वर्षानंतर त्यांना मुलगा झाला होता. 1 सप्टेंबररोजी त्याचा वाढदिवस होता. मात्र, त्यापूर्वीच अंशचा मृत्यू झाल्याने अंशच्या आईवडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.