

राजेश डांगळे
पनवेल: बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ अंतर्गत पनवेल येथील पाठ्यपुस्तक भांडार व वितरण केंद्रात यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी सुमारे सव्वा कोटी पाठ्यपुस्तके दाखल झाली असून वितरण प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सर्वशिक्षा अभियानअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ही मोफत पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पुस्तके उपलब्ध व्हावीत, यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. दरम्यान, उर्वरित मागणी पूर्ण करण्यासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावर पुस्तकांची छपाई सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
ही पाठ्यपुस्तके मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, तेलगू, बंगाली, तामिळ, सिंधी तसेच अरबी अशा एकूण दहा भाषांमध्ये तयार करण्यात आली आहेत. पनवेल केंद्रातून सहा महानगरपालिका क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने पुस्तकांचे वितरण केले जात असून वाहतूक व साठवण व्यवस्थेसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तके मोफत देण्यात येतात. शासन मान्य शाळांना थेट पुरवठा करून शाळांमार्फत विद्यार्थ्यांपर्यंत वितरण केले जाते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
राज्यातील शासनमान्य छापखान्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या साहाय्याने पुस्तकांची छपाई सुरू असून गुणवत्ता नियंत्रणालाही प्राधान्य दिले जात आहे. राज्यभरात गोरेगाव, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोल्हापूर आणि लातूर अशा आठ भांडार केंद्रांमार्फत वितरण व्यवस्था उभारण्यात आली आहे.
याशिवाय दहावी व बारावीच्या पाठ्यपुस्तकांची छपाईही मोठ्या प्रमाणावर सुरू असून ती टप्प्याटप्प्याने वितरित केली जाणार आहेत. यंदा दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या पुस्तकांमध्ये अभ्यासक्रमानुसार बदल करण्यात आल्यामुळे नव्या आवृत्त्यांची मागणी वाढली आहे.
शंभर नोंदणीकृत पुस्तक विक्रेते
राज्यात सुमारे शंभर नोंदणीकृत पुस्तक विक्रेते कार्यरत असून ठाणे येथे स्वतंत्र एजन्सीद्वारे पुरवठा केला जातो. एकूणच, पनवेल केंद्रातून सुरळीत वितरण सुरू असून, अजून छापून येणाऱ्या पुस्तकांमुळे कोणत्याही विद्यार्थ्याला पुस्तकांअभावी अडचण भासणार नाही, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.