

मुंबई : धारावी येथे हत्या झालेल्या युवकाच्या अंत्ययात्रेवेळी दगडफेक झाल्याने धारावीत वातावरण तणावपूर्ण बनले आहे. धारावी येथे अरविंद वैश्य या युवकाची रविवारी हत्या झाली होती, या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केलेली आहे. (Arvind Vaishya murder case Dharavi)
अरविंद (२६) येथील एका मेडिकल स्टोअरमध्ये काम करत होता. अरविंद यांचे काही युवकांसोबत भांडण झाले होते, त्यानंतर अरविंद धारावी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यास गेला होता. तेथून परत येत असताना या युवकांनी अरविंदची हत्या केली. अरविंद हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी कार्यरत होता, असे संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यच्या वेबसाईटवर म्हटलेले आहे. तर भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी ही घटना समाजासमाजात तेढ निर्माण करणारी आणि ती सहन केली जाणार नाही, असे ट्विट केले होते.
मंगळवारी अरविंद यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती, त्याला मोठ्या संख्येने लोक जमले होते. या अंत्ययात्रेवर एका इमारतीवरून दगडफेक करण्यात आली. त्यानंतर धारावी परिसरात दगडफेक आणि दुकानांची तोडफोड झाली. त्यानंतर पोलिस बंदोबस्तात अरविंद यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ही दगडफेक धारावी येथील ड्रग माफिया आणि गुंडानी केल्याचे X पोस्टमध्ये म्हटले आहे. "मी स्वतः या घटनेचा साक्षीदार आहे. पोलिसांनी या परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवून संबंधितावर कारवाई करावी," असे त्यांनी म्हटले आहे.