

मुंबई : नालेसफाई दौऱ्यातील गाड्यांच्या ताफ्यावरून भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साटम यांना विरोधकांनी टार्गेट केले होते. याचे वृत्त दैनिक पुढारीत प्रसिद्ध करण्यात आले होते.त्याची दखल घेत व्हीआयपी नालेसफाई दौऱ्यातील गाड्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नालेसफाई दौऱ्यावेळी आपल्या नेत्यासोबत उपस्थित न राहता स्वतंत्रपणे नालेसफाईचा दौरा करावा, अशा सूचनाच भाजपा नेत्यांनी आपल्या नगरसेवकांना केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केल्यानंतर भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या नालेसफाई दौऱ्याच्या वेळी 20 ते 25 वाहनांचा ताफा होता. त्यामुळे विरोधकांनी भाजपावर टीका केली होती. त्यामुळे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी आता सावध पावित्रा घेत, यापुढे नालेसफाईच्या दौऱ्याला गोतावळा नको, असे आदेशच मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांसह पालिकेतील महापौर व अन्य पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
महापौर रितू तावडे यांच्या गुरुवारी पश्चिम उपनगरात झालेल्या नालेसफाईच्या दौऱ्यात गाड्यांची संख्या जेमतेम तीन ते चार होती. सकाळी सात वाजल्यापासून सुरू झालेल्या या दौऱ्यात उपमहापौर संजय घाडी व अन्य पदाधिकारी सामील झाले होते.
गेल्यावर्षी पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे आयोजित करण्यात आले होते. त्याशिवाय विरोधकही नालेसफाईचा दौरा करत होते. या दौऱ्यात महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्त, पर्जन्य जलवाहिनी विभागाचे अधिकारी, नगरसेवक आमदार, पत्रकार दाखल होत असल्यामुळे दौऱ्यातील गाड्यांचा ताफा 30 ते 35 गाड्यांपेक्षा जास्त होता.
यावेळी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाची बचत करा असा सल्ला दिल्यामुळे दौऱ्यातील गाड्यांवर बंधने आली आहेत. स्वतः पंतप्रधानांनी आपल्या ताफ्यातील गाड्या कमी केलेल्या असताना त्यांच्याच पक्षातील नेते गाड्यांचा ताफा घेऊन फिरत असल्यामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळाल्यामुळे भाजपा सावध झाला असून यापुढे कोणत्याही व्हीआयपी सोबत अतिरिक्त गाड्यांचा ताफा नसेल याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश थेट दिल्लीवरूनच आल्याचे समजते.
नगरसेवक पोहोचले नाल्याच्या काठावर
व्हीव्हीआयपी दौऱ्यांवर होणारी टीका यामुळे भाजपचे नगरसेवक गुरुवारपासूनच आपल्या विभागातील नाल्याच्या काठावर दिसून आले. आपल्या प्रभागातील नालेसफाईची जबाबदारी त्या त्या नगरसेवकांवर टाकण्यात आली आहे. व झाले सफाईचा अहवाल वरिष्ठांना देण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यामुळे यापुढे नालेसफाईच्या राजकीय सहली थांबणार आहेत.