

नवी मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे ‘केतन अग्रवाल’ हत्या प्रकरण ताजे असतानाच, आता नवी मुंबईतील ऐरोली परिसरातून तशाच प्रकारची थरारक घटना समोर आली आहे. एका चाणाक्ष महिलेने आपल्या रिक्षाचालक प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.
एवढ्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्यासाठी पतीच्या मृतदेहाचे कटरने तीन तुकडे करून ते जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, या महिला आरोपीने तब्बल ११ महिने हा गुन्हा पचवला होता, मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर अखेर या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी पत्नी सुनीता कुशवाह आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. बलीराम सूर्यनाथ कुशवाह असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे.
पितळ उघडे पडले
मयत बलीराम कुशवाह हे ऐरोली येथील यादव नगर परिसरात आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह सुखाचा संसार करत होते. याचदरम्यान त्यांची पत्नी सुनीता हिचे घणसोली परिसरातील रिक्षाचालक राहुल प्रजापतीसोबत सूत जुळले.
या दोघांच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागताच बलीराम यांनी याला तीव्र विरोध केला. रोजच्या घरगुती वादामुळे सुनीता आणि राहुलने बलीराम यांना कायमचे मार्गातून दूर करण्याचा कट रचला. मात्र, पोलिसांनी या दोघांचेही पितळ उघडे पाडले.