

स्वप्निल कुलकर्णी
मुंबई: विठुरायाच्या गळ्यात तुळशीहार आणि वारकऱ्यांच्या गळ्यात तुळशीमाळ...देव आणि भक्तांचे हे अनोखे नाते गेल्या शेकडो वर्षांपासून चालत आलेले आहे. पंढरपुरात तुळशीच्या हार- फुलांबरोबरच तुळशीच्या माळेलाही मोठी मागणी असते. या व्यवसायातून अनेकांना रोजगार मिळाला. यातून दरवर्षी मोठी आर्थिक उलाढाल होते.
वारकऱ्यांची प्रिय देवता म्हणजे पांडुरंग अर्थात विठ्ठल. ‘तुळशीमाळा गळा कर ठेवूनी कटी’, ही विठ्ठलाची ओळख. त्यामुळेच वारकरी संप्रदायात तुळशीमाळेला अनन्य साधारण महत्त्व आहे.
पंढरपूरमध्ये अनेक वर्षांपासून येथील काशीकापडी समाज तुळशीमाळा बनवण्याचा व्यवसाय करत आहे. पंढरपूरमध्ये चार मोठ्या यात्रांसोबत रोज येणाऱ्या भाविकांची माळ घालण्याची संख्या मोठी असल्याने वर्षभर हा समाज माळा बनविण्याचे काम करीत असतो.
पंढरपूरजवळ तुळशीचे मळे आहेत. तेथून शेतकरी तुळस आणून देतात. रानतुळस, कृष्ण तुळस हे महत्त्वाचे दोन प्रकार आहेत. पंढरपुरात तयार होणारी माळ वारकरी मोठ्या भक्तिभावाने व श्रद्धेने खरेदी करून ती आपल्या गळ्यात घालतात.
अशी तयार होते तुळशीची माळ
तुळशीच्या काड्या खोडापासून काढतात. त्या साधारण सहा मिलिमीटर बाय दहा मिलिमीटर मापाच्या असतात. या काड्यांचे प्रथम छोटे तुकडे केले जातात. यावरून बारीक, जाड, मध्यम आकाराच्या मण्यांच्या माळा करतात.
काड्या पातेल्यात २० मिनिटे पाण्यात खळखळत उकळवतात. त्यामुळे काडी मऊ होते त्यावरील साल काढणे सोपे जाते. १०८ मण्यांची माळ, मधला मेरू मणी आणि जास्तीचे दोन मणी घातले जातात.