

नवी मुंबई : मागील पंधरा वर्षे केवळ चर्चेत असलेल्या ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरू झाले असून पायाभरणीने वेग घेतला आहे. या पुलासाठी 89 पिअर्स उभारण्यात येणार आहेत. यापैकी 44 पिअर्स पूर्ण झाले आहेत. उर्वरित पिअर्सचे फाऊंडेशनपर्यंत आलेले काम जून अखेरीस पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिले.
आयुक्तांनी गुरुवारी या उन्नत मार्गाच्या कामाची पाहणी केली. प्रकल्पाच्या मुख्य बांधकाम टप्प्याला प्रारंभ झाला असून सन 2027 अखेरपर्यंत हा मार्ग पूर्ण होईल असे माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावेळी आयक्तांनी पावसाळी कालावधीत स्पाईन, विंग आणि गर्डर कास्टिंगचे काम पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गर्डर लाँचिंगचे काम सुरू झाल्यानंतर ते मध्येच थांबवू नये. प्रत्येक कामाचे वेळापत्रक करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करा, असे स्पष्ट निर्देश यावेळी दिले.
सिडकोने नवी मुंबई शहराची उभारणी करताना बेलापूर ते ऐरोली असा 21.15 किलोमीटर लांबीचा पामबीच मार्ग नियोजित केला होता. मात्र 19.20 किलोमीटरपर्यंतचा मार्ग सन 2009 पर्यंत घणसोलीपर्यंत पूर्ण करण्यात आला. पुढील भागात कांदळवन क्षेत्र येत असल्याने पर्यावरण आणि इतर प्राधिकरणांच्या मंजुरीअभावी 1.94 किलोमीटर लांबीचा पुलाचे काम रखडले. सन 2017 मध्ये महापालिकेने जुना प्रस्ताव बदलून 1.94 किलोमीटरऐवजी 3.2 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग प्रस्तावित केला.
हा मार्ग मुलुंड-ऐरोली टोल मार्गावरील एमएमआरडीएकडून बांधण्यात येणाऱ्या ऐरोली-कटाई पुलाशी जोडण्याचे नियोजन करण्यात आले. या प्रकल्पासाठी सुमारे 372 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. मात्र कांदळवन विभाग, पर्यावरण विभाग तसेच उच्च न्यायालयातील याचिकांमुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला होता.
गत दोन वर्षांपूर्वी महापालिकेने ठेकेदाराला वर्कऑर्डर दिल्यानंतरही पर्यावरणीय अडथळे निर्माण झाले होते. आता पर्यावरण विभागाच्या मंजुरीसह माती परीक्षणाचे काम पूर्ण झाल्याने प्रत्यक्ष पिअर उभारणीचे काम सुरू झाले आहे. या उड्डाणपुलासाठी सुमारे 550 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडीवर दिलासा
ऐरोली-घणसोली उन्नत मार्ग पूर्ण झाल्यानंतर ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच एमआयडीसी क्षेत्रातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरळीत होणार आहे. तसेच नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीकडे जाणाऱ्या वाहनांना जलद पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.