

नवी मुंबई: हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जाणारा अधिक मास सुरू झाल्यामुळे शहरातील बाजारपेठा सध्या गजबजून गेल्या आहेत. धार्मिक विधी, व्रत-वैकल्ये आणि पारंपरिक रूढींना महत्त्व देत नागरिक विविध वस्तूंची खरेदी करत आहेत.
विशेषतः जावयाला वाण देण्याच्या प्रथेमुळे अनारसे, म्हैसूरपाक,पेढे, बर्फी यांसारख्या गोड पदार्थांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. परिणामी, मिठाई दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
अधिक मास हा दर तीन वर्षांनी येणारा विशेष महिना मानला जातो. या महिन्यात पूजा-अर्चा, दानधर्म, धार्मिक कार्यक्रम तसेच जावई व मुलीला वाण देण्याची परंपरा अनेक कुटुंबांमध्ये उत्साहात पाळली जाते. त्यामुळे बाजारात पूजासाहित्य, मिठाई, कपडे, भांडी व भेटवस्तूंच्या खरेदीला मोठा वेग आला आहे.
विशेषतः जावईबापूंसाठी देण्यात येणाऱ्या वाणात अनारसे आणि म्हैसूरपाक यांना मोठे महत्त्व असते. त्यामुळे अनेक मिठाई विक्रेत्यांकडे या पदार्थांच्या ऑर्डर वाढल्या आहेत. काही दुकानांमध्ये तर अनारसे तयार करण्यासाठी अतिरिक्त कामगार ठेवण्यात आले आहेत. पारंपरिक पद्धतीने बनवलेले घरगुती अनारसे ग्राहकांकडून विशेष पसंत केले जात आहेत.
आगाऊ ऑर्डरही दिल्या जात आहेत
मिठाई विक्रते किसन सोई यांनी संगितले की, अधिक मास सुरू झाल्यानंतर विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अनेक कुटुंबांकडून आगाऊ ऑर्डर दिल्या गेल्या आहेत. वाणासाठी केवळ मिठाईच नव्हे तर चांदीची ताटे, वाट्या, समई, कपडे, साड्या, पूजासाहित्य तसेच पितळ व तांब्याच्या वस्तूंचीही खरेदी होत आहे.
अनारशांचे दर प्रतिकिलो 400 ते 600 रुपये असून म्हैसूरपाक 500 ते 800 रुपये किलो दराने विकला जात आहे. तूप, साखर आणि इतर खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींचा परिणाम मिठाईच्या दरांवर झाला असला तरी ग्राहकांकडून खरेदीचा उत्साह कायम आहे.