नाना पटोले : सीमाभागात मराठीजनांवरील हल्ल्याबाबत भाजप गप्प का? | पुढारी

नाना पटोले : सीमाभागात मराठीजनांवरील हल्ल्याबाबत भाजप गप्प का?

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला आहे. सीमाभागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भाजप नेते गप्प का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

भाजपचे हे मौन मराठी बांधवांचा अपमान करणारे असून हल्ल्याला त्यांची मूक संमती असल्याचे द्योतक आहे. कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत असताना त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी मध्यवर्ती एकीकरण समितीचे शहराध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली. दळवी यांच्यावरील हल्ला हा मराठी भाषिकांवरील हल्ला असून हा अपमान व मराठी भाषकांची गळचेपी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. महाराष्ट्राची जनता दळवी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

राज्यातील भाजप नेते चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह एकाही नेत्याने बेळगावमधील हल्याचा साधा निषेधही केला नाही याचे आश्‍चर्य वाटते.कर्नाटकातील भाजप सरकारच्या आशीर्वादाशिवाय ही गुंडगिरी होऊ शकत नाही. या दडपशाहीला वेळीच आवर घालावा व राज्यातील भाजप नेत्यांनी सीमाभागातील हल्ल्याप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पटोले यांनी केली .

‘दुतोंडी भूमिका उघड’

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मराठी मते मिळावीत म्हणून ‘मराठी कट्टा’ सुरू करता आणि सीमाभागातील मराठी भाषकांवरील हल्ल्याबाबत गप्प बसता, ही दुतोंडी भूमिका मराठी लोकांच्या लक्षात आली आहे. भाजपच्या या दुतोंडी भूमिकेला जनता पुरती ओळखून आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

Back to top button