मुंबई: पुढारी वृत्तसेवा: मागील सहा महिन्यात मुंबईत २४ वे अवयवदान झाले असून मंगळवारी दोन व्यक्तींनी केलेल्या अवयवदानातून नऊ जणांना जीवनदान मिळाले आहे.
नवी मुंबई येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये उरण येथे राहणारे ५१ वर्षीय प्रितेश राजाराम पाटील यांना हायपरटेन्शन त्रास असल्याने १५ जून रोजी दाखल करण्यात आले. पण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना १८ जून रोजी ब्रेन डेड घोषित केले. त्यानंतर कुटुंबियांनी अवयवदानाचा निर्णय तत्काळ घेतला. अवयवदानानंतर यकृत, किडनी, फुफ्फुस, कॉर्निया दान केल्यामुळे ६ जणांना जीवनदान मिळाले. त्यांचे यकृत अपोलो हॉस्पिटलमध्ये रूग्णाला प्रत्यारोपण केले. त्याचे यकृत गिरगावमधील एचआर रिलायन्समध्ये ग्रीन कॉरिडॉरने पाठविण्यात आले.
प्रितेश यांच्या वडिलांनी आणि पत्नीने ब्रेन डेड झाल्यानंतर अवयवदान करण्यास संमती दिली. प्रितेशही अवयवदानाबद्दल जागरूक होता. नेहमीच अवयवदानाबद्दल चर्चा करत असल्याने अवयवदान करून इतरांना जीवनदान देण्याचा निर्णय घेतला. हृदय कमकुवत झाल्याने दान करता आले नाही, याचे वाईट वाटते, असे प्रितेशचे भाऊ सागर पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, पवई येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये ६० वर्षीय दिपंकर मोत्रा यांचे अवयवदान करून तिघांना जीवनदान मिळाले आहे. त्यांचे फुफ्फुस, यकृत आणि एक किडनी दान करण्यात आली आहे.
या नवीन वर्षात अवघ्या सहा महिन्यांत २४ ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान केल्यामुळे सुमारे ५५ रुग्णांना नवजीवन मिळाले आहे. २०२३ मध्ये ५० ब्रेन डेड रुग्णांमधून १४४ जणांना अवयवदानातून नवीन जीवन मिळाले.
हेही वाचा