पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य मौसमी वारे अर्थात मान्सून मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांचा वेग मंदावला होता. पण आता मान्सून वेग घेत आहे. मान्सून २१-२२ जूनपर्यंत आणखी प्रगती करेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून (IMD) बुधवारी सांगण्यात आले.
"मुंबईत पावसाचा वेग गेल्या दोन-तीन दिवसांत थोडा कमी झाला होता. पण आता त्याने वेग घेतला आहे. मान्सूनची सध्याची स्थिती मध्यम मजबूत स्वरुपाची दिसत आहे. येत्या २-३ दिवसांत मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरासाठी यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठीही यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील उर्वरित भागात अलर्ट नाही. पण तेथे मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील…" अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागाचे (आयएमडी) प्रमुख सुनील कांबळे यांनी दिली.
मुंबईत मान्सून धडकल्यानंतर त्याचा वेग मंदावला होता. परंतु तो हळूहळू मध्यम होत आहे. २१-२२ जूनपर्यंत तो वेग घेईल आणि किनारपट्टी भागात चांगला पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात या काळात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असेही त्यांनी सांगितले. बुधवारी सकाळी मुंबईतील अनेक भागात पावस पडला. मान्सून सामान्य वेळेपेक्षा दोन दिवस आधीच ९ जून रोजी मुंबईत दाखल झाला होता. तेव्हापासून त्यात फारशी प्रगती झाली नाही. अद्याप मान्सूनने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग व्यापलेला नाही.
१ जून रोजी मान्सूनचा हंगाम सुरू झाल्यापासून देशात २० टक्के कमी पाऊस झाला आहे. जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे मंगळवारी हवामान विभागाने (IMD) ने सांगितले होते. जून आणि जुलै हा शेतीसाठी सर्वात महत्त्वाचा मान्सून कालावधी मानला जातो. कारण या काळात खरीप पिकाच्या बहुतांश पेरण्या पूर्ण होतात.
हे ही वाचा :