अकोला/मुंबई; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय एका कार्यकर्त्याने पाण्याने धुतल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे समोर आला आहे. या प्रकारामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या घटनेमुळे पटोले आणि काँग्रेसची सरंजामशाही आणि शोषणकर्ती मानसिकता उघड झाली आहे. त्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा देत माफी मागावी, अशी मागणी भाजप नेत्यांनी केली आहे.
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे संत श्री गजानन महाराजांची पालखी वाडेगाव येथे मुक्कामी होती. यादरम्यान, पाऊस पडला होता. त्यामुळे पालखीच्या ठिकाणी सर्वत्र चिखल झाला. पटोले यांनी चिखलातून मार्ग काढत पालखीचे दर्शन घेतले. चिखलामुळे पटोले यांचे पाय मातीने माखले होते. ते धुण्यासाठी त्यांनी पाणी मागविले. त्यावेळी विजय गुरव नावाच्या काँग्रेस कार्यकत्याने त्यांचे पाय धुतले. याचा व्हिडीओ सध्या व्हायला होऊ लागल्यामुळे पटोले वादाच्या भोवर्यात सापडले आहेत.