मुंबई : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीतील विजय हा अंतिम नाही. लढाई आता सुरू झाली आहे. देशाची लोकशाही वाचविण्यासाठी इंडिया आघाडीला देशातील जनतेने जे मतदान केले, त्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मते दिली आहेत. त्यामुळे येत्या लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी ताकदीने, एकजुटीने लढून महाराष्ट्रात सत्ताबदल घडवून आणणार, असा निर्धार करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या तिन्ही पक्षांनी आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
लोकसभा निवडणुकीतील देदीप्यमान यशानंतर महाविकास आघाडीची शनिवारी दुपारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये संयुक्त पत्रकार परिषद झाली. आघाडीला मिळालेल्या यशामध्ये जनतेचा मोठा वाटा आहे. जनतेने आम्हाला दिलेले हे बळ आहे, असे सांगत आघाडीच्या नेत्यांनी या बैठकीतून लोकसभा निवडणुकीतील विजयाबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आणि सर्वच छोट्या-मोठ्या राजकीय पक्षांचे, सामाजिक संघटनांचे आभार मानले. यावेळी आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपावर टीकेची तोफ डागली.
या पत्रकार परिषदेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते.