Dombivli MIDC Blast: अमुदानच्या शक्तिशाली स्फोटात ९४१ मालमत्तांचे नुकसान

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: सोनारपाड्याजवळ असलेल्या एमआयडीसीतील अमुदान कंपनीत गुरूवारी (दि. 23) झालेल्या शक्तिशाली स्फोटात (Dombivli MIDC Blast)  क्षतिग्रस्त झालेल्या मालमत्तांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दुर्घटनास्थळाच्या एक ते दोन किलोमीटर परिघातील कंपन्या, हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, इमारती, घरे अशा आतापर्यंत 941 क्षत्रिग्रस्त मालमत्तांचे पंचनामे करण्यात आले आहेत. या पंचनाम्यांचा सविस्तर अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार सचिन शेजाळे यांनी सांगितले. स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी एकूण 25 तलाठी नेमण्यात असल्याचेही ते म्हणाले.

डोंबिवली एमआयडीसीच्या (Dombivli MIDC Blast) फेज दोनमधील अमुदान कंपनीत झालेल्या रिॲक्टरच्या शक्तिशाली स्फोटात जखमी झालेल्या 68 जखमींपैकी 57 रूग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. उर्वरित 11 रूग्णांवर विविध रूग्णालयांतून उपचार सुरू आहेत. त्यापैकी 5 रुग्ण अतिदक्षता विभागात आणि 6 रूग्ण साधारण विभागामध्ये उपचार घेत आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार स्फोटग्रस्त परिसरात आजपर्यंत 10 मृतदेह सापडले असून त्यातील 3 मृतदेहांची ओळख यापूर्वीच पटवून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

या व्यतिरिक्त आतापर्यंत आढळून आलेल्या काही शरीराच्या भागांचे डीएनए सँपल घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. यापूर्वी घेण्यात आलेले डीएनए सँपल पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आजही महापालिकेचे अग्निशमन पथक आणि इतर अधिकारी व कर्मचारी पथक, एमआयडीसीचे अधिकारी व कर्मचारी हे घटनास्थळावर हजर असून दुर्घटना स्थळावरील मलबा उचलण्याचे काम अजूनही सुरू आहे. या संदर्भात अंबरनाथ एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी विजय मोरे म्हणाले, केमिकल मिश्रित डेब्रिज उचलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी 10 डंपर आणि 2 पोकलेनचा वापर करण्यात येत आहे. लोखंड-स्टील व्यतिरिक्त उचललेले केमिकल मिश्रित डेब्रिज तळोज्यातील बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंटच्या ताब्यात देण्यात येत आहे. त्यानंतर त्याची तेथील डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावली जाईल, असेही अधिकारी मोरे यांनी सांगितले.

Dombivli MIDC Blast : शोकाकूल कुटुंबीयांकडून तपास यंत्रणांवर दबाव

अनेक मृतदेहांची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर, तर कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाच्या माध्यमातून बेपत्ता कामगारांच्या नातेवाईकांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे चाचणीसाठी पाठविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आपल्या बेपत्ता व्यक्तीचा शोध लागत नसल्याने अनेक कामगारांचे कुटुंबीय शोकाकूल वातावरणात आहेत. आमच्या कामगारांचा शोध लावून द्या, असा दबाव या कुटुंबीयांकडून तपास यंत्रणांवर वाढत आहे.

28 अवयवांद्वारे लागणार मृतांचा छडा

अमुदानसह लगतच्या सप्तवर्ण, कॉसमॉस केमिकल कंपनीतील 9 कामगार अद्यापही बेपत्ताच आहेत. बचाव कार्य करताना कामगारांचे विविध अवशेष सापडतात. हे अवशेष डोंबिवलीच्या शास्त्रीनगर, तर कल्याणच्या रुक्मिणीबाई रूग्णालयाकडे पाठविण्यात येतात. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रूग्णालयात सद्या 6 मृतदेह असून 3 अवयव आहेत. तर कल्याणच्या रूक्मिणीबाई रुग्णालयात 1 मृतदेह आणि सोमवारी सापडलेल्या पायाच्या पांज्यासह 25 अवयव जमा करण्यात आले आहेत. एनडीआरएफसह अग्निशामक दलाच्या हाती आतापर्यंत 28 अवयव हाती लागले असून या अवयवांद्वारे न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून मृतांचा छडा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मानवी अवयवांचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे

मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी आठ कुटुंबीयांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. याशिवाय स्फोटातील मानवी अवयव तपासणीसाठी घेण्यात आले असून ते कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे शास्त्रीनगर रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी बडेकर यांनी सांगितले. आतापर्यंत 18 विविध प्रकारचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. तर जसे मानवी अवयव बचाव पथकाकडून रूग्णालयात येतात तसे ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविले जातात, असे कल्याणच्या रूक्मिणीबाई रूग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके यांनी सांगितले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news