Lok Sabha Election 2024 : उमेदवार यादीचे राहू द्या, थेट अर्जच भरा | पुढारी

Lok Sabha Election 2024 : उमेदवार यादीचे राहू द्या, थेट अर्जच भरा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  महायुतीत जवळपास पाच जागांवरचा तिढा कायम आहे. संभाव्य बंडखोरी आणि नाराजी टाळण्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यापेक्षा थेट उमेदवारी अर्जच भरण्याच्या पर्यायाची भाजपकडून चाचपणी सुरू आहे. विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि सातारा लोकसभा मतदारसंघातील इच्छुकांना भाजपने याबाबतच्या सूचना दिल्याचे समजते. ( Lok Sabha Election 2024 )

संबंधित बातम्या 

सातारा, रत्नागिरी, नाशिक, दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई अशा काही जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. यातील सातारा आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन जागांवर भाजप उमेदवार निवडणूक लढविणार हे नक्की झाले आहे. सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे इच्छुक आहेत.

या दोन्ही बड्या नेत्यांना थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना भाजपने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उदयनराजे आणि राणे यांची उमेदवारी भाजपकडून अद्याप घोषित करण्यात आली नाही. मात्र मतदारसंघात त्यांचा प्रचार सुरू झाला असून बंडखोरी टाळण्यासाठी हा सावधगिरीचा उपाय असल्याचे सांगण्यात येते.

याच आठवड्यात भरणार अर्ज

भाजपने उदयनराजे आणि नारायण राणे यांना हिरवा कंदील दिला आहे. उदयनराजे हे 18 एप्रिलला, तर राणे हे 19 एप्रिलला आपला अर्ज दाखल करणार असल्याचे समजते. या दोन्ही मतदारसंघांत तिसर्‍या टप्प्यात म्हणजेच 7 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 12 एप्रिलला उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 19 एप्रिल हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा
दिवस आहे.

दोन दिवसांत अमित शहा घेणार निर्णय

दरम्यान, सिंधुदुर्ग-रत्नागिरी या लोकसभेच्या जागेसंदर्भात दोन दिवसांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निर्णय घेणार असून तोवर इच्छुक असलेले उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनी दोन दिवस शांत राहावे, असा सबुरीचा सल्ला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. किरण सामंत यांनी रविवारी रात्री फडणवीस यांची नागपुरातील निवासस्थानी भेट घेतली होती. दरम्यान, दुसरे इच्छुक नारायण राणे यांनाही शांत राहण्याच्या तशाच सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आपण तीन लाख मतांनी जिंकू, पाच वर्षे काम केले, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर यावर तोडगा निघेल यावर विश्वास आहे. त्यांचा जो काही आदेश असेल तो मान्य असेल, अशी कबुली किरण सामंत यांनी दिली होती.

दुसरीकडे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीत भाजप की सेना लढणार हा तिढा कायम आहे. दोन दिवसांपूर्वी फडणवीस यांना उद्योगमंत्री उदय सामंत भेटून गेले. हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे धनुष्यबाणावरच निवडणूक लढवली गेली पाहिजे यावर त्यांनी भर दिला. ( Lok Sabha Election 2024 )

Back to top button