मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महायुतीत काही जागांचा निर्माण झालेला तिढा अद्याप सुटला नसल्याने इच्छुक उमेदवारांची अस्वस्थता वाढली आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगड आणि नंतर धुळे, तर देवेंद्र फडणवीस हे इंदापूर दौर्यावर आल्याने बोलणी पुढे सरकली नाही. मात्र, येत्या दोन दिवसांत जागावाटपावर अंतिम तोडगा काढला जाणार असल्याचे समजते. (Lok Sabha Elections 2024)
महायुतीत नाशिक, ठाणे, पालघर, छत्रपती संभाजीनगर, दक्षिण मुंबई, सातारा या जागांवर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. नाशिक मतदारसंघ मंत्री छगन भुजबळ यांच्यासाठी सोडावा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच भाजपही आग्रही आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवर गंडांतर आले आहे. गोडसे उमेदवारी टिकावी म्हणून प्रयत्न करत असले तरी भाजप श्रेष्ठी भुजबळ यांच्या बाजूने असल्याने गोडसे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता अधिक आहे, तर सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले यांना भाजपाच्या कमळ चिन्हावर उमेदवारी देण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. (Lok Sabha Elections 2024)
ठाणे लोकसभा मतदारसंघावर भाजपाने केलेला दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमान्य केल्याने ही जागा शिवसेनेकडे रहाणार असली तरी त्यांना पालघर भाजपाला सोडावी लागली आहे. तर दक्षिण मुंबई मतदारसंघातूनदेखील भाजप उमेदवार देणार आल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता या मतदारसंघावर सोमवारपर्यंत अंतिम तोडगा काढला जाणार आहे. (Lok Sabha Elections 2024)