Lok Sabha Election 2024 : जे गेले ते ईडीच्या भीतीनेच; राहुल गांधी यांचा हल्लाबोल | पुढारी

Lok Sabha Election 2024 : जे गेले ते ईडीच्या भीतीनेच; राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अनेक पक्षाचे नेते आपला मूळ पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांना या पक्षाच्या ध्येयधोरणाशी काही देणे-घेणे नाही. केवळ जेलवारी टाळण्यासाठी ईडीच्या भीतीने ते गेले आहेत, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी केला. राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेला इंडिया आघाडीतील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

ईडी, सीबीआय आणि ईव्हीएमचा भाजपकडून गैरवापर होत आहे. ईव्हीएमशिवाय ते निवडणूक जिंकू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. राहुल गांधी म्हणाले. भाजपकडे भ्रष्टाचाराची मक्तेदारी आहे. ‘पैसे द्या, कंत्राट घ्या’ अशी पॉलिसी देशभरात सुरू केली आहे. या सरकारच्या मागे एक सर्वात मोठी शक्ती आहे. ती म्हणजे देशातील उद्योगपती. सर्वसामान्य जनतेकडून आवाजवी कर वसुली केली जात असताना या उद्योगपतींवर मात्र सवलतीचा वर्षाव केला जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

भाजपमध्ये जाणार्‍यांची संख्या वाढली आहे. सर्व पक्षातील नेते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. याचा अर्थ भाजपच्या तत्त्वांच्या आणि धोरणाच्या प्रेमात पडून ते जात नाहीत तर जेलवारीला घाबरून ते पक्षांतर करीत आहेत. अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली जाते. अक्षरशः गळा पकडून त्यांना घाबरवून सोडले जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

Lok Sabha Election 2024 : ‘छोडो भाजप’चा नारा : पवार

केंद्रातील सरकारकडून देशातील जनतेला वेगवेगळी आश्वासने देण्यात आली. पण ती कधीच पूर्ण झाली नाहीत, असा आरोप शरद पवार यांनी आपल्या भाषणात केला. याच मुंबई शहरात 1942 मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘छोडो भारत’चा नारा दिला होता. त्याच धर्तीवर आता ‘छोडो भाजप’चा नारा आम्ही देत आहोत.

Lok Sabha Election 2024 : ईव्हीएमविरोधात लढा द्यावा लागेल : आंबेडकर

लोकसभेची निवडणूक एकत्र लढली काय किंवा स्वबळावर लढली काय, आपल्याला ईव्हीएमच्या विरोधात लढा द्यावाच लागणार आहे. मोदी का परिवार या भाजपच्या गीताची प्रकाश आंबेडकर यांनी खिल्ली उडवली.
देशात महागाई प्रचंड वाढली आहे. गॅस सिलिंडरपासून खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. देशात गरिबी इतकी वाढली आहे की, देशभरातील 80 टक्के लोकांना मोफत रेशन द्यावे लागते, असे सांगत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोलचे दर 2 रुपयांनी कमी करून सरकारकडून महागाई कमी केली जात असल्याचा आव आणला जात आहे. असे अब्दुल्ला म्हणाले.

Lok Sabha Election 2024 : हुकूमशाहीविरोधात लढाई : उद्धव ठाकरे

एनडीए विरुद्ध इंडिया हा संघर्ष म्हणजे देशातील हुकूमशाहीविरुद्ध लढा आहे, असे शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. भाजप हा फुगा आहे. त्यात हवा भरण्याचे काम आम्हीही काही काळ केले होते. त्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. ‘चारसो पार’चा नारा त्यांनी दिला असला तरी ही काही फर्निचरची लढाई नव्हे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. कोणीही राज्यकर्ता अमरपट्टा घेऊन येत नाही. कधी ना कधी जावेच लागते, असे ते म्हणाले.

Lok Sabha Election 2024 : जेलवारी टाळण्यासाठी महाराष्ट्रातील नेता भाजपमध्ये

राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावरही जोरदार हल्ला केला. मात्र, त्यांचा थेट नामोल्लेख केला नाही. भाजपमध्ये जाण्यापूर्वी हा नेता सोनिया गांधी यांना भेटला. सत्ताधारी लोकांविरोधात लढण्याची माझ्यात हिंमत नाही, मी जेलमध्ये जाऊ इच्छित नाही, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष सोडताना ते अक्षरशः रडले, असे राहुल गांधी म्हणाले.

Back to top button