आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे चिन्ह ‘मशाल’च?
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा सर्वोच्च न्यायालयातील अंतिम फैसला लोकसभा निवडणुकीआधी होण्याची शक्यता मावळली आहे. कारण यावर १ मार्चला होणारी सुनावणी आता थेट १९ एप्रिलला होणार आहे. तेव्हापर्यंत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागु झाली असेल, त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक ठाकरे गटाला मशाल चिन्हच घेऊन निवडणूक लढवावी लागु शकते.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देताना निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिले. या निकालाविरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली होती. आता हा कालावधी जवळपास नऊ-दहा महिने झाला असतानाही यावर सुनावणी झालीच नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ताबा कुणाचा या संदर्भातली सुनावणी १९ एप्रिलला होणार आहे. तेव्हापर्यंत लोकसभेची आचारसंहिता घोषित झालेली असेल. कदाचित पहिला टप्पाही पार पडलेला असेल. त्यामुळे ठाकरे गटाला आता आहे त्याच मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी लागण्याची शक्यता आहे.
शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाच्या कक्षेत गेला. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे दिला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर साधारण नऊ-दहा महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, आतापर्यंत या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून शिवसेना ठाकरे गटाला ‘शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे पक्षचिन्ह देण्यात आले होते. पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सुनावणी न्यायालयात अजुनही प्रलंबित असल्यामुळे ठाकरे गट आगामी लोकसभा निवडणूक ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावासह आणि ‘मशाल’ या पक्ष चिन्हासह लढवण्याची शक्यता आहे.
दरम्यान, ऋतुजा लटके यांनी यापूर्वी याच नावासह आणि चिन्हासह विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर अजुनही निवडणूक चिन्ह आणि पक्ष याबद्दलचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासह निवडणूक लढवू शकतील तर ठाकरे गटाला मात्र ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव आणि ‘मशाल’ हे पक्षचिन्ह वापरावे लागू शकते.
हेही वाचा