राज्यसभा निवडणूक अखेर बिनविरोधच; सहा जागांसाठी सहा अर्ज दाखल
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या गुरुवारच्या शेवटच्या दिवशी सहा जागांसाठी सहाच प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यसभेसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी शुक्रवारी होणार आहे. या छाननीनंतर राज्यसभा निवडणूक बिनविरोध झाल्याची घोषणा होईल.
संबंधित बातम्या
- Maharashtra Politics : काँग्रेसच्या 8 आमदारांची बैठकीस दांडी; नांदेडमधील दोन गैरहजर तर…
- अंतरवालीत जरांगेंचे उपोषण सुरू; मात्र बाहेरून येणाऱ्यांसाठी गावकऱ्यांकडून अन्नसेवा
- अंतरवालीत जरांगेंचे उपोषण सुरू; मात्र बाहेरून येणाऱ्यांसाठी गावकऱ्यांकडून अन्नसेवा
राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे सहा सदस्य राज्यसभेवर निवडून द्यायचे आहेत. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, डॉ. अजित गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी आपले अर्ज दाखल केले. पुण्यातील विश्वास जगताप या एका हौशी उमेदवाराने अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आमदारांच्या सह्या नसल्याने हा अर्ज बाद ठरणार आहे.