

पुढारी ऑनलाईन डेस्क: मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. भाजपात संधी दिल्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांचे आभार मानले. हा माझा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन आणि जबाबदारी पार पाडेन असे मत अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले. मुंबई भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांच्या उपस्थितीत आज (दि.१३) अशोक चव्हाण यांनी हातात कमळ घेतले. (Ashok Chavan in BJP)
पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, मी आता काही बोलणार नाही, वेळ आल्यावर नक्की बोलेन. राजकारण सेवेचं माध्यम आहे. देशात राज्यात चांगले काम करायचा आहे. आजपासून सकारात्मक कामला सुरूवात होत आहे. महाराष्ट्रात भाजपा भक्कम स्थितीत आहे. त्यामुळे पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन आणि पार पाडेन. तसेच पक्ष आणि फडणवीसांच्या सूचनेनुसार काम करणार असल्याचेही ते म्हणाले. (Ashok Chavan in BJP)
मी कोणालाही आमंत्रित, निमंत्रित केलेले नाही. वैयक्तिक टीका महाराष्ट्राची परंपरा नाही, असे देखील मत अशोक चव्हाण यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना उल्लेखून म्हटले आहे. (Ashok Chavan in BJP)
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज मंगळवारी (दि.१३) भाजपमध्ये प्रवेश केला. काल (दि.१२) त्यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्त्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी आज (दि.१३) दुसऱ्याच दिवशी भाजपसोबत नवीन राजकीय कारकिर्दीला सुरूवात करणार असल्याचे म्हटले होते. यानुसार अशोक चव्हाण यांनी आज मुंबईतील भाजप कार्यालयात आज अधिकृतपणे पक्षप्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.