अध्यादेशाला धोका निर्माण झाल्‍यास पुन्हा आझाद मैदानात येणार : मनोज जरांगे | पुढारी

अध्यादेशाला धोका निर्माण झाल्‍यास पुन्हा आझाद मैदानात येणार : मनोज जरांगे

मुंबई ; पुढारी ऑनलाईन मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगें यांनी गेल्‍या अनेक दिवसांपासून उपोषण, आंदोलन केले होते. अखेर आज या आंदोलनाला यश आले. काल (शुक्रवार) रात्री सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्‍या. आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्‍वत:हा जरांगेंच्या उपोषणस्‍थळी हजेरी लावत जरांगेंकडे अध्यादेशाची कागदपत्रे सुपुर्द केली. यावेळी दोघांनी एकमेकांना विजयाचा टीळा लावला आणि ज्‍यूस पाजवून जरांगेंचे उपोषण सोडवले. यावेळी जरांगेंनी सरकारने नवा अध्यादेश दिल्‍याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच यापुढे आरक्षण टिकवणे सरकारची जबाबदारी आहे. मुख्यमंत्र्यांनी गुलालाचा अपमान होउ देउ नये अशी भूमीका मांडली. तसेच जर अध्यादेशाला धोका निर्माण झाल्‍यास पुन्हा आझाद मैदानात येणार असल्‍याचे विराट सभेत जाहीर केले.

काल रात्री सरकारने अध्यादेशाची प्रत मनोज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली. यानंतर आज सकाळपासून एपीएमसी मार्केट मध्ये मराठा आंदोलकांनी विजयाचा जल्‍लोष केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्‍थळी येत जरांगे यांना सरकारच्या अध्यादेशाची नवी प्रत दिली. यावेळी मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्यावतीने सरकारचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी जरांगे यांनी ज्‍यांची कुणबी नोंद मिळाली त्‍यांच्या गणगोतातील सर्वांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असल्‍याचे सांगितले. तसेच ओबीसींना असणाऱ्यांना सर्व सवलती मराठ्यांना मिळणार असल्‍याचे सांगत, हा विजय महाराष्‍ट्रातील सर्व मराठा बांधवांचा असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. दरम्‍यान मुख्यमंत्र्यांनी या विजयाच्या गुलालाला अपमानीत होउ देउ नये. यापुढे मराठा आरक्षण टीकवण्याची जबाबदारी सरकारची आहे. जर भविष्‍यात अध्यादेशाला धोका निर्माण झाल्‍यास पुन्हा आंदोलन करणार असल्‍याचही जरांगे यांनी विराट सभेत जाहीर केलं.

हेही वाचा : 

Back to top button