मुंबई : पुढारी वृत्तसेवा : पुढील दोन दिवस महाराष्ट्रात विशेषतः राज्याच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असून मुंबई शहर व उपनगरांमध्ये पारा १३ ते १५ अंश सेल्सियस इतका खाली येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
सोमवारपासून मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी आणि सोमवारी आयएमडी सांताक्क्रुझ येथे किमान १६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हा सर्वात थंड दिवस ठरला. मंगळवारी त्यात एका अंश सेल्सियसने वाढ झाली. आयएमडी कुलाबा येथे किमान १९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. मुंबईत थंडी कायम राहणार असून पुढील ४८ तासांत पारा १३-१५ डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे. मुंबईसह ठाण्यातही पारा खाली येईल. ठाण्यात १४- १५ तसेच कल्याण आणि अंतर्गत भागात १२-१३ अंश सेल्सियस तसेच पुण्यातील किमान तापमान १० अंश सेल्सियस इतके कमी नोंदले जाण्याची शक्यता आहे. जळगाव, नाशिक जवळील काही भागात पारा १० अंश सेल्सियसच्या खाली जाऊ शकतो. आयएमडी शास्त्रज्ञ आणि हवामान तज्ञांच्या मते, उत्तरेकडील वार्यामुळे किनारपट्टीवरील शहराच्या तापमानात घट होत आहे.