Cyber Crime : सायबर गुन्हेगारीत धोक्याचा इशारा, महाराष्ट्र होतोय ‘जमतारा’!­­ | पुढारी

Cyber Crime : सायबर गुन्हेगारीत धोक्याचा इशारा, महाराष्ट्र होतोय 'जमतारा'!­­

मुंबई : ताजेश काळे :पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली अथवा आपल्याला मोठी लॉटरी लागल्याचे सांगून ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्यांची मोठी संख्या उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, हरयाणा या राज्यांत आहे. आता महाराष्ट्रातही अशाचप्रकारे फसवणूक करणाऱ्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. इन्शुरन्स कंपनीची बंद पॉलिसी रिन्यूव्ह करून जमा असलेले पैसे व्याजासह परत देण्याचे आमिष दाखवून ग्राहकांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या एका टोळीचा ठाणे सायबर क्राइम शाखेच्या पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला. विशेष म्हणजे, या टोळीत संपूर्ण मराठी तरुण-तरुणींचा सहभाग असल्याचे आढळले आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या दरदिवशी वाढणाऱ्या तक्रारींचा छडा लावणे महाराष्ट्र सायबर पोलिसांसाठी जणू मोठे आव्हानच ठरले आहे. (Cyber Crime)

ठाण्यातील कारवाईतून सायबर गुन्हेगारीचे भीषण चित्र समोर

ठाणे पोलिसांच्या सायबर क्राईम शाखेने गेल्या आठवड्यात एका इन्शुरन्स कंपनीच्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ठाणे रेल्वेस्थानकाच्या अगदी जवळ असलेल्या बाल गणेश टॉवर या इमारतीमधील ३०८ क्रमांकाच्या ऑफिसवर छापा मारून टोळीचा सूत्रधार तेजस ससाणे (रा. चिंचाणी, नेरळ) याच्यासह ग्राहकांना लुबाडणाऱ्या १० तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी वापरला जाणारा मोबाईल फोन जप्त केला. इन्शुरन्स कंपनीच्या विमाधारकांचा चोरी केलेला डेटा वापरून या तरुणी लोकांना कॉल करत होत्या. पॉलिसीची जमा रक्कम मिळवून देण्यासाठी ग्राहकांकडून एका हफ्त्याचे पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जात होती. या टोळीने किती लोकांना फसविले, याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. ठाणे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.

Cyber Crime : वाढत्या तक्रारी बनताहेत डोकेदुखी

मुंबई, पुणे, नागपूर या शहरांमध्ये
ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तक्रारी आणि गुन्ह्यांचा तपास ही सायबर
पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे.

सायबर गुन्ह्यांची आकडेवारी

देशात : 52,974
तेलंगणा : 10,303
उत्तर प्रदेश : 8,829
कर्नाटक : 8,136
महाराष्ट्र : 5,562

हेही वाचा 

Back to top button