आता तरी सरकारच्या स्थैर्यावर शंका नको : देवेंद्र फडणवीस | पुढारी

आता तरी सरकारच्या स्थैर्यावर शंका नको : देवेंद्र फडणवीस

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन करताना आम्ही संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन केले होते. काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत होते; पण आता विधानसभा अध्यक्षांनी विविध नियमांचा दाखला देत जो आदेश दिला आहे, त्यानंतर आता तरी कुणाच्या मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका असू नये, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आम्ही संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन केल्याने हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा आपल्या आदेशात सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नसल्याचे म्हटले होते; पण काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवत होते. मी पुन्हा सांगतो, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल! असे सांगतानाच या निकालाबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांचे अभिनंदन केले.

Back to top button