Uddhav Thackeray : जागावाटपात आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही! : उद्धव ठाकरे | पुढारी

Uddhav Thackeray : जागावाटपात आघाडीत बिघाडी होऊ देणार नाही! : उद्धव ठाकरे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : देश आणि लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. कोणीही कितीही वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तरी काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे जागावाटप सुरळीतपणे होईल. माझ्याकडून आघाडीत बिघाडी कदापि होऊ देणार नाही, अशी स्पष्टोक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. जागावाटपासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची लवकरच एकत्र बैठक घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Uddhav Thackeray)

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार यांचे खंदे समर्थक, माजी महापौर आणि माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. (Uddhav Thackeray)

ठाकरे म्हणाले की, 30 एप्रिलच्या आत लोकसभेच्या निवडणुका होतील, अशी चर्चा आहे. 30 एप्रिलपर्यंत निकाल लागला तर तुमचे काहीतरी ठीक होईल, असे कुणीतरी त्यांना सांगितल्याचा टोला भाजपला लगावला. पुढील काही दिवसांत दिल्लीत पुन्हा बैठक होईल. यात व्यवस्थित जागावाटप होईल. (Uddhav Thackeray)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बाबरी पडली तेव्हा शिवसैनिक नव्हते, या विधानाचा ठाकरेंनी समाचार घेतला. बाबरी पाडायला ते घुमटावर गेल्यावर त्यांच्या वजनाने ढाचा पडला असेल तर माहिती नाही; पण त्यांचा गृहपाठ कमी पडत आहे. शिवसेनाप्रमुख, शिवसेनेच्या योगदानाबद्दल ते बोलू शकतात यावरून फडणवीस यांची मानसिकता कशी आहे ते लोकांना कळते.

राम मंदिराचा राजकीय इव्हेंट नको!

राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. ठाकरेंनी यावर भूमिका मांडली. राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा कोणी राजकीय इव्हेंट करू नये, अशा शब्दांत भाजपला खडसावले. मी कधीही अयोध्येत जाईन आणि रामलल्लाचे दर्शन घेईन, असेही ठाकरे म्हणाले.

Back to top button