Stock Market : बैल चौखूर उधळला! | पुढारी

Stock Market : बैल चौखूर उधळला!

मुंबई, वृत्तसंस्था : ‘न भूतो न भविष्यती’ असा चमत्कार शेअर बाजारात बघण्याचे अहोभाग्य शुक्रवारी गुंतवणूकदारांना लाभले. सेन्सेक्सने 970 अंकांची वाढ नोंदवून 71,484 वर उसळी मारली, तर निफ्टी 274 अंकांनी वाढून 21,457 अशा विक्रमी पातळीवर बंद झाला. या तेजीच्या वातावरणामुळे गुंतवणूकदारांनी तब्बल तीन लाख कोटी रुपयांची कमाई केली. गेल्या 23 वर्षांतील हा उच्चांक होय. सोबतच बँक निफ्टीनेही 48,143 अंकांचा विक्रम नोंदवला. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापाराची आश्वासक स्थिती, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याज दरात कपातीचे मिळालेले स्पष्ट संकेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जिंकून दिलेल्या गॅरंटीमुळे भारतीय शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली. (Stock Market)

मुंबई शेअर बाजारात सलग दोन दिवस तेजीचा वारू वेगाने दौडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. माहिती तंत्रज्ञान (आयटी), बँकिंग आणि वित्तीय संस्थांच्या शेअरमध्ये मोठी वाढ नोंदविण्यात आली. बीएसईत एचसीएल टेक, टीसीएस आणि इन्फोसिस कंपनीच्या शेअरने पाच ते सहा टक्क्यांनी उसळी घेतली. एसबीआय, टाटा स्टील, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि विप्रोच्या शेअरमध्येही चांगली वाढ झाली. नेस्ले, भारती एअरटेल, मारुती आणि आयटीसी कंपनीचा शेअर कोसळला. निफ्टी आयटी निर्देशांकाने तब्बल साडेचार टक्क्यांनी झेप घेतली. मेटल आणि पीएसयू बँकेचा निर्देशांक प्रत्येकी दोन टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे ऑटो, फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुडस् (एफएमसीजी), मीडिया आणि रियाल्टी निर्देशांकात काहीशी घट दिसून आली. (Stock Market)

नवीन नोंदणी झालेल्या आयआयईडीए कंपनीचा शेअर सात दिवसांच्या वाढीनंतर कोसळला. शेअरला दहा टक्क्यांचे लोअर सर्किट लावावे लागले. पंजाब नॅशनल बँकेने एक लाख कोटींचे भांडवली मूल्य पार केल्यामुळे शेअरमध्ये दीड टक्का वाढ झाली. गेल्या सहा महिन्यांत पंजाब नॅशनल बँकेचा शेअर 80 टक्क्यांनी वधारला आहे.

निफ्टीवर एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस, एसबीआय, अदानी एंटरप्रायजेस हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स 3.52 ते 5.73 टक्क्यांनी वाढले; तर नेस्ले इंडिया, एचडीएफसी लाईफ, भारती एअरटेल, बजाज ऑटो, एसबीआय लाईफ हे घसरले.

आठवडाभरात 8.55 लाख कोटींची कमाई

बीएसईच्या नोंदणीकृत कंपन्यांचे बाजारमूल्य शुक्रवारी 2.76 लाख कोटी रुपयांनी वाढले. सोमवार ते शुक्रवारच्या सत्रात मिळून कंपन्यांचे बाजारमूल्य 8.55 लाख कोटी रुपयांनी वाढून 357.78 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना तब्बल साडेआठ लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.

आव्हानांची मालिका पार करून मिळवले आश्वासक यश

नव्या सहस्रकात प्रवेश केल्यापासून भारतीय शेअर बाजार वधारण्याची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. तथापि 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी, त्यानंतर 8 नोव्हेंबर 2018 रोजी जारी करण्यात आलेले निश्चलनीकरण (नोटबंदी), पाठोपाठ 2020 मध्ये आलेली कोव्हिडची लाट यामुळे अर्थव्यवस्था एका आव्हानात्मक कालखंडातून गेली. तरीदेखील ही सगळी आव्हाने मोदी सरकारने यशस्वीरीत्या पेलली आणि अर्थव्यवस्थेला गती दिली. त्यामुळेच आज सारे जग भारतीय अर्थव्यवस्थेकडे आकर्षित झाल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या निर्देशांकांत सातत्याने वाढ दिसत असून गेल्या मार्चमध्ये झालेला सगळा तोटा भरून निघाला आहे. नॅसडॅक, डोव जोन्स किंवा जपानच्या निकेई यांच्याप्रमाणेच निफ्टी 50 च्या बाबतीत भारतीय शेअर बाजाराची घोडदौड सुरू आहे. (Stock Market)

विदेशातून पैसा येणार, भारतीय बाजार बहरणार!

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती चलनविषयक संस्थेने आगामी वर्षात व्याज दरामध्ये किमान तीनदा कपात करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे आणखी मोठ्या प्रमाणात वळू लागले. नवीन वर्षात बाजारातील तेजीचा वारू आणखी चौफेर उधळू शकतो. याचे कारण म्हणजे भारतीय शेअर बाजारातून मिळणारा अधिकचा परतावा.

म्हणून बाजार वधारतोय

  • पंतप्रधान मोदी यांनी मांडलेला गॅरंटीचा मुद्दा जनतेला भावला.
  • स्थिर सरकार येणार याबद्दल गुंतवणूकदारांची खात्री पटली.
  • चीनचा वृद्धी दर आगामी काळात घटणार असल्याचा अंदाज.
  • महागाई ढोबळपणे नियंत्रणात ठेवण्यात सरकारला यश.

Back to top button