मातामृत्यूमध्ये राज्य दुसर्या क्रमांकावर
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारने 2022 मध्ये मातामृत्यू दर एक लाख जन्मदरामागे 38 मृत्यूंवरून 33 प्रमाण करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. हे उद्दिष्ट साध्य करण्यात केरळनंतर महाराष्ट्राचा नंबर आहे. केरळमध्ये सर्वात कमी मातामृत्यूची नोंद झाली असून महाराष्ट्र यात दुसर्या क्रमांकावर आहे.
प्रसूतीनंतर किंवा प्रसूतीदरम्यान आरोग्य समस्या ओळखण्यासाठी राज्यभरात, आशा कार्यकर्त्यांना सरकार आणि स्वयंसेवी संस्थांकडून प्रशिक्षण देण्यात आले आहे. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल भागात यामुळे फायदा झाला आहे. गेल्या वर्षी, जागतिक आरोग्य संघटनेकडून कोविड-19 मध्ये काम केल्याबद्दल आणि भारतातील माता मृत्यू दर लक्षणीय प्रमाणात कमी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आशासेविकांना ग्लोबल हेल्थ लीडर पुरस्कार देण्यात आला आहे.
आशा कार्यकर्त्यांनी माता मृत्यू कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. गावागावांमध्ये आशा सेविका घरोघरी पोहोचून जनजागृती करत आहेत. नोंदणी केल्यानंतर पाठपुरावा करून सल्लाही देत आहेत. गर्भवती महिलांना शिक्षित, समर्थन आणि योग्य आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी त्यांच्या परिश्रमपूर्वक कार्याने माता आरोग्य परिणाम सुधारण्यात, संस्थात्मक प्रसूतींना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर यांनी सांगितले.