हिंमत असेल तर निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मतदारांना पडणारे प्रश्न आणि शंका दूर करण्यासाठी दम असेल तर एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. सगळे वातावरण विरोधात आहे, एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. असे असताना पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी हे आव्हान दिले.

शिवसेनेच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या 'शिवालय' कार्यालयाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी देशातील निवडणुकांचे निकाल, शेतकर्‍यांचे प्रश्न आणि धारावीच्या मुद्द्यावर सरकारवर टीकेची झोड उठवली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले आहे. तुमची एवढी लाट असेल, तुमच्यात हिंमत आणि आत्मविश्वास असेल, तर लोकसभेची निवडणूक देशभर बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवा. नाहीतर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा.

बॅलेट पेपरची मतमोजणी करण्यासाठी वेळ लागतो, या तक्रारीबाबत ठाकरे म्हणाले की, लोकशाही आणि देशाचे भवितव्य ठरवणार्‍या निवडणुकीच्या मत मोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले, तर काय फरक पडतो. महापालिका निवडणूक एक-दोन वर्ष पुढे ढकलण्यात आली आहे. त्यात वेळ जात नाही का, असा प्रतिप्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर टीका

निवडणूक प्रचारात देवाच्या नावाने, धर्माच्या नावाने मते मागितली तर तो गुन्हा होतो का, असा प्रश्न निवडणूक आयोगाला आम्ही विचारला होता. कर्नाटकच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजरंग बलीच्या नावाने मते मागितली. तर मध्य प्रदेशात अमित शहा यांनी मतदारांना रामलल्लांचे फुकट दर्शन घडवण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. परंतु एकमेव हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात हिंदुत्वाचा मुद्दा घेतला, राम मंदिराचा मुद्दा घेतला तर त्यांच्यावर सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घातली. त्यांचा मतदानाचा मूलभूत अधिकारही काढून घेतला. यावेळी मी अमित शहा यांच्या वक्तव्यावरून प्रश्न विचारला तर निवडणूक आयोगाने त्यावर अजून उत्तर दिले नाही. आयोगाने उत्तर न दिल्यास देवाच्या आणि धर्माच्या नावाने मते मागायला तुमची काहीच हरकत नाही, असे आम्ही गृहित धरू. तुमची मान्यता आहे असे मानून आम्ही आगामी निवडणुकीत 'जय भवानी जय शिवाजी', 'हर हर महादेव', 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष करून प्रचार करू. हिंदुत्वाचे प्रश्न उघडपणे मांडू, त्यावेळी तुम्हाला आमच्यावर कारवाई करता येणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिली.

अदानीविरोधात 16 तारखेला मोर्चा

धारावी पुनर्विकास प्रकल्पानंतर आता अभ्युदय नगर, आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन पुनर्विकास प्रकल्प अदानी समूहाला देण्याचा राज्य सरकारचा हट्ट आहे. पूर्वी एक म्हण होती, 'सारी भूमी गोपाल की', त्यानुसार 'सारी मुंबई अदानी की' असा सगळा कारभार चालला असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. सरकारला जाब विचारण्यासाठी आणि अदानी समूहाला स्पष्टीकरण विचारण्यासाठी येत्या 16 डिसेंबरला धारावीतून अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news