आयटी कर्मचार्यांचे काम, सप्ताहात पन्नास तास थांब!
मुंबई; वृत्तसंस्था : कामगारांनी आठवड्यात किती तास काम करावे यावरून काही आठवड्यांपूर्वी देशभरात वादंग उठला होता. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या वादानंतर माहिती आणि तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये (आयटी) दररोज सरासरी दहा तास काम करून घेतले जात असल्याची माहिती समोर येत आहे. मानकापेक्षा दहा तास अधिक राबवून घेतले जात आहे.
आयटी कंपनीतील कामगारांना सप्ताहात 45 ते 50 तास काम करावे लागते. आयटी कंपन्यांचा आठवडा पाच दिवसांचा असल्याने दररोज साधारण दहा तास काम करावे लागते. मानकानुसार सप्ताहातील 40 तास काम करणे अपेक्षित आहे. घेतलेल्या कामाच्या वेळा पाळण्यासाठी अनेकदा अधिकच काम करावे लागत असल्याचे आयटीतील कामगारांचे म्हणणे आहे.
कामाच्या या ताणामुळे उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे पाहणीतून समोर आले आहे. गेल्या पाच आर्थिक वर्षांत कर्मचार्यांची उत्पादकता स्थिर राहिली आहे. आयटी कंपन्या एका कामगारावर एक रुपया खर्च करीत असेल, तर त्यातून कंपनीला 1.8 ते 1.9 रुपयेच मिळत आहे. त्यात वाढ झालेली नाही. एक्सफेनो डेटा कंपनीने ही माहिती समोर आणली आहे. त्यासाठी कंपनीने टीसीएस, इन्फोसिस, एचसीएलटी टेक, विप्रो, टेक महिंद्रा, एलटीआय माईंडट्री आणि एम्फसिस या कंपन्यांनी जाहीर केलेल्या वार्षिक अहवालांचा आधार घेतला आहे.
एका बड्या आयटी कंपनीत काम करणारा 27 वर्षीय आदित्य म्हणाला, भारतीय परंपरेत श्रमाला खूप महत्त्व आहे. तुम्ही दररोज किती काम करता यावर मेहनतीचे मूल्यमापन केले जाते. आयटीमध्ये दररोज दहा तास अथवा त्याहून अधिक काम करायला लावतात. मात्र, त्यामुळे उत्पादकतेत काही वाढ होत नाही. कारण तुमचा मेंदू थकून जातो. त्याला एखाद्या समस्येवर काम करण्यासाठी अधिक कालावधी लागतो.
मूर्तींच्या इच्छेपेक्षा आयटी वीस तास मागे
देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी तरुणांनी आठवड्याला 70 तास काम करावे, असे वक्तव्य इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केले होते. या वक्तव्यानंतर बराच गदारोळ उडाला. मात्र, आयटी क्षेत्र मूर्ती यांनी केलेल्या आवाहनाच्या वीस तास मागे आहे.
उत्पादकतेतील वध-घट
टीसीएस, विप्रो आणि एचसीएलटेक कंपनीच्या प्रतीकर्मचारी महसुलात आर्थिक वर्ष 2023 मध्ये 3.8 ते 11 टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. तर, इन्फोसिस आणि टेक महिंद्रा या कंपन्यांची उत्पादकता 2.6 आणि 5.6 टक्क्यांनी वाढली आहे. आयटी कंपन्यांच्या एकूण महसुलापैकी 50 ते 54 टक्के रक्कम वेतनावर खर्च होते.