Sangali News : आता गाफील राहून चालणार नाही; जरांगे-पाटलांचे सांगलीच्या सभेतून मराठ्यांना आवाहन | पुढारी

Sangali News : आता गाफील राहून चालणार नाही; जरांगे-पाटलांचे सांगलीच्या सभेतून मराठ्यांना आवाहन

पुढारी ऑनलाईन डेस्क : आपण आराम बसलो तर आपल्या लेकरांचे वाटोळे होईल. आता गाफील राहून चालणार नाही, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यातील मराठा समाजाला केले. मराठा आरक्षण प्रश्नावर आज (दि.१७) सांगली येथे आयोजित सभेत ते बोलत होते. जेव्हा जरांगे पाटील बोलण्यास उभे राहिले तेव्हा सभेत एक मराठा लाख मराठा, शिवाजी महाराज की जय अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Sangali News)

Sangali News : आरक्षण मिळेपर्यंत ताकदीने एकजूट दाखवा- जरांगे-पाटील

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, गेल्या ७० वर्षांपासून मराठ्यांना वेढा पडला आहे. त्यामुळे मराठ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. म्हणून राज्यातील मराठ्यांना माझे आवाहन आहे की, एकजूट करा. एकत्र या. बिनकामाचे कळप एकत्र येत आहेत, त्यामुळे उद्यापासून आरक्षण मिळेपर्यंत ताकदीने एकजूट दाखवली पाहिजे. आरक्षण हा आपल्या पोरांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. पोरं उद्ध्वस्त झाली, तर जात देखील संपेल. त्यामुळे आपली जात संपता कामा नाही, असे आवाहन देखील मनोज जरांगे पाटील यांनी सभेत केले.

मराठ्यांचा व्यवसाय शेती, मग ओबीसीत समावेश का नाही?

१८०५ पासून १९६७ पर्यंत कुणबी जात प्रमाणपत्राचे पुरावे सापडले आहेत. मराठा समाजाचा व्यवसाय देखील शेतीच आहे. ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी सर्व निकष मराठा समाजाने पूर्ण केले आहेत. आज तेच पुरावे बाहेर आले आहेत. म्हणून आम्ही आरक्षणाची मागणी करत आहे. माळी समाजाचा व्यवसाय हा शेती त्याचा ओबीसीमध्ये समावेश तर मराठ्यांचा का नाही? असा प्रश्न देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.

आम्ही आरक्षण मागितलं तर काय बिघडलं?

आपली मराठा जात संपवण्यासाठी चारी बाजूंनी वेढा दिला आहे. ज्यांना आरक्षण मिळालं ते कोणत्या आधारावर मिळालं ते पहिला सांगा. मग आम्ही आरक्षण मागितलं तर काय बिघडलं. प्रत्येक समितीने म्हटलं तुमच्याकडे पुरावेच नाहीत, पण तेव्हा सरकारवर दबाव होता, त्यामुळे मराठ्यांचे पुरावे नष्ट करण्यात आले. मराठ्यांना ओबीसीत आरक्षण असताना देखील त्यांना आरक्षणापासून लांब ठेवण्यात आले, अशी टीका देखील जरांगे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा:

Back to top button