शरद पवार- अजित पवार यांच्यात होणार्या भेटीने जनतेत संभ्रम : विजय वडेट्टीवार
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वारंवार होणार्या भेटीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अशा सोयीस्कर राजकारणामुळे महाविकास आघाडी आणि जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
पवार कुटुंबीयांची झालेली ही भेट त्यांचा वैयक्तिक विषय असला, तरी शरद पवार आणि अजित पवार यांच्या वारंवार होणार्या भेटी म्हणजे सोयीस्कर राजकारण असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. फायदा नसेल तेव्हा दूर जायचे, फायदा असला की जवळ यायचे, अशा सोयीस्कर राजकारणामुळे लोकांत संभ्रम निर्माण होतो. अशा भेटी टाळायला हव्यात, असेही ते म्हणाले.
जरांगे-पाटील यांना गर्व चढलाय
‘हम झुका सकते हैं,’ असा गर्व मनोज जरांगे-पाटील यांना चढला असल्याचा आरोपही यावेळी वडेट्टीवार यांनी केला. तेे राज्य सरकारला धमक्या देत आहेत. मराठा समाजाला केंद्राच्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचे चांगले फायदे मिळत असताना ओबीसीत येऊन नुकसानच होणार आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.