फडणवीस : मंत्रीच माथी भडकवणार असतील, तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची | पुढारी

फडणवीस : मंत्रीच माथी भडकवणार असतील, तर दंगलीची जबाबदारी राज्य सरकारची

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर लोकांची माथी भडकवणारी, चिथावणी देणारी विधाने भर मंचावरून करीत असतील, तर या दंगलीची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची असेल, अशी प्रतिक्रिया विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोंदवली.

त्रिपुरात ज्या घटना घडल्याच नाहीत, त्यावर महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटणे, हे अतिशय दुर्दैवी आहे, असे नमूद करत फडणवीस यांनी शांततेचेही आवाहन केले.

फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये मशीद जाळली गेल्याचा आरोप केला गेला. प्रत्यक्षात मशीद जाळण्याची कोणतीही घटना झालेलीच नाही. त्या मशिदीचे फोटोसुद्धा जारी करण्यात आले. त्यामुळे ज्यांनी खोटा प्रचार केला, त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात आली. पण, महाराष्ट्रात निव्वळ अफवांवर मोर्चे काढण्यात आले. जाळपोळ करण्यात आली आणि हिंदूंची दुकाने जाळली गेली. अमरावतीतील घटनाक्रम हा अस्वस्थ करणारा आहे. हा एका सुनियोजित षड्यंत्राचा भाग वाटतो, असे फडणवीस म्हणाले.

भाजपकडून दंगलीचे राजकारण : पटोले

 

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपचे षड्यंत्र आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी केला.

या षड्यंत्राला राज्यातील जनतेने बळी पडू नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहनही त्यांनी केलेे. पटोले म्हणाले, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण यात त्यांना यश आले नाही. आता महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे उद्योग सुरू झाले आहेत.

वाढती महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून देशभर भाजपविरुद्ध तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्द्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपकडून असे षड्यंत्र रचले जात आहे. हिंसक कारवाया करणार्‍यांवर आणि अफवा पसरवणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

Back to top button