Supriya Sule on BJP : ‘सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग महत्त्‍वाचा’ : सुप्रिया सुळेंची स्‍पष्‍टाेक्‍ती | पुढारी

Supriya Sule on BJP : 'सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग महत्त्‍वाचा' : सुप्रिया सुळेंची स्‍पष्‍टाेक्‍ती

पुढारी ऑनलाईन डेस्क : मी राष्‍ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष झाले असते तर मला भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असता. मलाही तशी ऑफर होती; पण मी अध्यक्ष झाले असते तरीदेखील भाजपसोबत गेले नसते. मी माझ्या विचारधारेशी फारकत घेणे अशक्य होते. भाजपसोबत जाणं माझ्या तत्त्वात बसत नाही. मी माझ्या मताशी तडजोड करणार नाही. सत्तेपेक्षा संघर्षाचा मार्ग महत्त्वाचा आहे, असे आज खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. (Supriya Sule on BJP)

यावेळी खा. सुळे म्हणाल्या, शरद पवार यांना पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायचा नव्हता. शरद पवार हेच अध्यक्ष रहावेत, असं भुजबळांना देखील वाटत होतं. नव्या अध्यक्ष नेमणुकीसाठीच्या समितीला भुजबळांचा विरोध होता. शरद पवार हुकूमशहा नाहीत. त्यामुळे तेव्हाच शरद पवार यांनी मी भाजपसोबत जाणार नाही. तुम्हाला जायचे असेल तर जा, असे यापूर्वीच स्पष्ट केले होते. याला बुधवारी छगन भुजबळ यांनी एका चॅनलला मुलाखत देताना दुजोरा दिल्याचे देखील सुळे म्हणाल्या. (Supriya Sule on BJP)

 शरद पवार विचारधारेशी ठाम

मला राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष करण्याचा प्रस्ताव होता  मी माझ्या विचार धारेशी ठाम राहिले. मी संर्घषाचा मार्ग निवडला आहे. माझे वडील शरद पवार त्यांच्या विचारधारेशी ठाम आहेत. त्यांना यापूर्वी देखील मी काँग्रेसच्या विचारधारेशी ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचा विचार बदल नाहीत. वेळ आली तर आम्ही रस्त्यावर उतरू; परंतु विचारांशी फारकत घेणार नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना अंधारात ठेवून अनेक निर्णय

पहाटेचा शपथविधी आणि २ जुलै, २०२३ चा शपथविधी हा शरद पवार यांना अंधारात ठेवून घेतलेले निर्णय आहेत, असे बुधवारी एका मुलाखतीत छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. शरद पवार हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतानाही त्यांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. या बद्दल अनेकांच्या मनात आजही शंका आहे आणि अनेकांच्यात या बद्दल शरद पवार यांच्याबद्दल उलटसुलट चर्चा आहेत. पण  छगन भुजबळ यांच्या मुलाखतीतून हे स्पष्ट झाले आहे, असेही खासदार सुळे म्हणाल्या.

भाजपने आमची माफी मागावी

भाजपने नॅशन करप्ट पार्टी म्हणून राष्ट्रवादीचा उल्लेख केला. भाजपकडून सतत राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हणता मग भाजपने आमच्याशी चर्चा कशी केली? असा सवाल देखील सुळे यांनी केला. भाजपने आमच्यावर केलेले आरोप हे खोटे आहेत. त्यामुळे भाजपने आमची माफी मागावी,अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.

हेही वाचा:

 

 

Back to top button