दंगली घडविण्याचा सत्ताधार्यांचा प्रयत्न : संजय राऊत
मुंबई : मणिपूर, हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचा कट सुरू आहे. पण राज्याची जनता सुज्ञ आहे. ती अशा प्रकारच्या कटकारस्थानाला बळी पडणार नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप केला. तसेच हिंसाचारासह महत्त्वाच्या चर्चांपासून दूर ठेवण्यासाठीच राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली जात नसल्याचा दावाही राऊत यांनी केला.
ते म्हणाले, मणिपूर, राजस्थान, हरियाणा आणि दिल्लीच्या सीमेवर दंगली घडविण्यात येत आहेत. महाराष्ट्रात तशा दंगली घडाव्यात म्हणून देवेंद्र फडणवीस, भाजप आणि त्यांचे गुरुजी मंडळ तणाव निर्माण करत आहे.