चुकीच्या बातम्या प्रकाशित केल्यास वृत्तपत्रांवर हक्कभंग : उपमुख्यमंत्री फडणवीस
मुंबई : वृत्तपत्रांनी पूर्ण माहिती घेऊनच बातमी प्रकाशित करावी, अन्यथा त्यांच्यावर हक्कभंगासारखी कारवाई करावी लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी दिला.
विविध शासकीय विभागात अनेक पदे रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत. भरतीची कामे खासगी कंपन्यांमार्फत केली जातात. या कामात भ्रष्टाचार होतो, असा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला. यासाठी त्यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या काही बातम्यांची कात्रणेही दाखवली. त्यावर फडणवीस यांनी वरील इशारा दिला.
ते म्हणाले, भरतीची परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएस या नामांकित कंपन्यांकडून घेतल्या जातात. त्यामुळे अशा प्रकारच्या गैरप्रकाराला यात थारा नाही. एखाद्या ठिकाणी तक्रारी आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात येते. यासंदर्भातील वर्तमानपत्रातील बातम्या चुकीच्या माहितीवर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वृत्तपत्रांनी पूर्ण माहिती घेऊन बातमी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली.