![देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F04%2Fdevendra-fadnvis.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (दि. १३) भिवंडी येथे सभा पार पडली. या सभेदरम्यान त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या घडामोडींची महत्त्वपूर्ण माहिती दिली. यावेळी त्यांनी बोलत असताना, शिवसेनेसोबतची युती ही मैत्री आहे तर राष्ट्रवादी सोबतची युती ही राजकीय स्वरुपाची आहे लवकरच तिचे भावनिक मैत्रीमध्ये रुपांतर होईल, असे स्पष्ट केले आहे.
महाविजय २०२४ हे भाजपचे सध्याचे अभियान सुरु आहे. याप्रसंगी आज भिवंडी येथे बोलत असताना फडणवीस यांनी राजकीय घडामोडी आणि भाजपचा प्रवास याबाबत माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, २०१९ ची उत्तरं ही २०२३ मध्ये मिळाली. आता २०२३ ची उत्तरे ही २०२६ मध्ये मिळतील.
ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यानच्या पोहरादेवीतील सभेवर फडणवीस यांनी टीका केली. यावेळी बोलत असताना ते म्हणाले की, पोहरादेवीत शपथ घेताना ठाकरे खोटं बोलले असतील. त्यामुळे काहीजण शपथही खोट्या घेतात, असा टोला त्यांनी फडणवीसांना लगावला. दरम्यान त्यांनी राजकीय घडामोडींची माहिती देत असताना 'मी संजय राऊत नाही, त्यामुळे माझ्या विधानांचा अर्थ काढू नका' अशी खोचक टीका देखील राऊत यांच्यावर केली.
२०१९ च्या निवडणुकीतील मुख्यमंत्रीपदाबाबतच्या पेचप्रसंगाबाबत फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण खुलासा यावेळी केला. मुख्यमंत्रीपदाबाबत ठाकरेंनी सांगताच शहांशी चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री भाजपचाच असेल असे शहांनी सांगतिले. अशी चर्चा त्यावेळी झालेली होती. तसेच अमित शहांना एका व्यक्तीचा रात्री १ वाजता फोन देखील आला होता, अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
निवडणुकीनंतर आकड्यांची जुळवाजुळव केल्यानंतर ठाकरेंकडून युती तोडण्यात आली. त्यामुळे २०१९ मध्ये ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला. बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत फॉर्म्युला ठरलेला नव्हता. शहा म्हणाले अपमान सहनकर पण बेईमानी नको. जेव्हा जेव्हा बेईमानी होते तेव्हा कुटनिती वापरावीच लागते.
भाजपचा प्रवास हा विरोधापासून सुरु झाला आहे. विरोधकांकडून अनेक टीका भाजपवर झालेल्या आहेत. त्यामुळे जनसंघ ते भाजपपर्यंतचा प्रवास हा संघर्षमय आहे. कार्यकर्त्यांमध्ये संयम आणि विश्वास आहे. असे फडणवीस यावेळी म्हणाले.
ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी एकनाथ शिंदे जन्माला येतील. शिवसेनेची आणि आमची जी युती झाली आहे. ती आमची जुनी मैत्री आहे. ही मैत्री भावनिक आहे. मात्र, राष्ट्रवादीसोबतची आमची मैत्री ही राजकीय आहे. पुढच्या काही वर्षांमध्ये ही मैत्री देखील भावनिक होईल, असे फडणवीस यावेळी म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले म्हणाले अजित पवार हे विभीषण, मला आता आनंद होत आहे. कारण त्यांचा विभीषण आमच्याकडे आहे. तुष्टीकरण करणाऱ्यांना आमच्या पक्षात स्थान नाही. आमचे दरवाजे खुले आहेत पण काँग्रेसला आम्ही सोबत घेणार नाही. तसेच एमआयआम, मुस्लीम लीग यांना देखील सोबत घेणार नाही. असं फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी फडणवीस यांनी मिशन १५२ चा नारा दिला. अर्थात भाजपला १५२ जागा जिंकायच्या असतील, तर किमान २०० हून अधिक जागा लढवाव्या लागतील. याआधी २०१९ मध्ये भाजपने १६४ जागा लढवून १०५ जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये ५९ जागांवर पराभव झाला होता. अर्थात भाजपने २०० हून अधिक जागा लढवल्यास अजित पवार गट आणि शिंदे गटाला जेमतेम जागा लढवायला मिळतील, हे स्पष्ट आहे.
भाजप बेईमान नाही, सोबत आलेल्यांना सांभाळणार. तिन्ही पक्ष एकत्र मिळून जागा वाटप करणार. दरम्यान यावेळी त्यांनी महिला मंत्री केली नाही तर विस्तार करणारच नाही, असा विश्वास देखील फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसेच २०१९ नंतरची काही उत्तरे मिळाली असतील आता २०२३ च्या निवडणुकीबाबतची उत्तरे २०२६ ला मिळतील, अशी माहिती देखील फडणवीस यांनी दिली.
हेही वाचा