पुढारी ऑनलाईन डेस्क : जंगालत कितीही प्राणी एकत्र आले तरी ते वाघाची शिकार करू शकत नाही, अशी टीका नांदेडमध्ये आयोजित सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआडीवर केली होती. त्याच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिले. अनेक ठिकाणी कोल्हे, लांडगे वाघाचे कातडे घालून फिरत आहेत. पण शिवसेना खरा वाघ आहे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, "हे कधी वाघ झाले, आता अनेक ठिकाणी कोल्हे, लांडगे वाघाचे कातडे घालून फिरत असतात. पण जेव्हा खरा वाघ येतो तेव्हा ते स्वत: शिकार होत असतात. शिवसेना वाघ आहे, शिवसेनेचं बोधचिन्हच वाघ आहे, जे बाळासाहेब ठाकरेंनी रेखाटलं आहे. तुम्ही चित्र चोरण्याचा प्रयत्न केला तरी देशातील खरा वाघ शिवसेना आणि ठाकरे परिवारच असल्याचे ते म्हणाले.
शनिवारी नांदेड येथील सभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. "ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपाबरोबर निवडणूक लढवली होती, ते हिंदुत्व आता कुठं आहे. केवळ सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले, अशी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले की, "अमित शहांच्या नांदेडमधील 20 मिनिटांच्या भाषणात 7 मिनिटे ते फक्त उद्धव ठाकरेंवरच बोलले, याचा अर्थ मातोश्रीचा दबदबा अजूनही कायम आहे. शिवसेना पक्ष तोडला, नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं, यानंतरही ठाकरे आणि शिवसेनेची भिती त्यांना असल्याचे दिसते, ही भीती चांगली आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा ठाकरेंच्या शब्दावर विश्वास आहे बाहेरच्या लोकांवर नाही. अडीच वर्षापुर्वी शिवसेनेला मुख्यमंत्री पद दिले नाही आणि त्यातील फुटलेल्या गटाला आता मांडीवर बसवले आहे. हा धोका कोणी दिला हे ते स्वात: सिद्ध करत आहेत, असे राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :