मुंबई : वृत्तसंस्था : मशिदींवरील भोंग्यांमुळे ध्वनिप्रदूषण होत असताना पोलिस त्याविरोधात कारवाई का करत नाहीत, असा प्रश्न करून भोंगे न काढणे आणि पोलिसांनी कारवाई न करणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदविले आहे.
कांदिवली भागातील लक्ष्मी नगरातील गौसिया मशिदीच्या भोंग्यांवरून दाखल याचिकेवर सुनावणी झाली. मशीद व्यवस्थापनावर कारवाई का केली नाही, याबाबत झोन 12 च्या पोलिस उपायुक्तांनी खुलासा करावा, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणाबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करायलाच हवे, असा आग्रहही न्यायालयाने धरला. रिना रिचर्ड यांनी ही याचिका दाखल केली आहे. पोलिसात तक्रार देऊनही कारवाई होत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पुढील सुनावणी 29 मे रोजी आहे.