Rohit Pawar | 'शालेय गणवेशाचा घाट ५० टक्क्यांसाठी तर नाही ना?' रोहित पवारांचा शिक्षणमंत्र्यांना सवाल
पुढारी ऑनलाईन डेस्क : यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सरकारी शाळांसाठी आता एकच गणवेश असेल अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी (दि.२२) केली. तसेच सरकारच्या निर्णयापूर्वीच अनक शाळेंनी गणवेशाच्या कपड्यासाठी ऑर्डर दिल्याचेही केसरकर यांनी सांगितले. यावरून ६ दिवसांच्या शाळेत ५० टक्के दिवस (३ दिवस) शासनाचा तर ५० टक्के (३ दिवस) दिवस शाळेचा गणवेश घालण्याचा घाट ५० टक्क्यांसाठी तर नाही ना? असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी उपस्थित केला आहे.
रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडेलवरून यासंदर्भातील ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, शाळेचा एक गणवेश असतानाही शासनाचा दुसरा गणवेश का?, तर ‘राज्यातील शालेय मुलांना एकसारखे गणवेश असे पाहिजेत व विद्यार्थ्यांना शिस्त लागली पाहिजे’ शिक्षणमंत्र्यांचं हे लॉजिक शाळेतल्या लहान पोरांनाही पटणार नाही, असे देखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटले आहे.
‘शाळेचा एक गणवेश असताना शासनाचा दुसरा गणवेश का तर राज्यात एकसारखे गणवेश पाहिजे व विद्यार्थ्यांना शीस्त लागली पाहिजे’, शिक्षणमंत्र्यांचं हे लॉजिक शाळेतल्या लहान पोरांनाही पटणार नाही. ६ दिवसांच्या शाळेत ३-३ दिवस म्हणजेच ५० % दिवस शासनाचा तर ५० % दिवस शाळेचा गणवेश घालण्याचा घाट ५० %… pic.twitter.com/IfBKpLVCg6
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2023
मुलांचा गणवेश कोणताही असला तरी, त्यामुळे मुलांच्या गुणवत्तेत काही फरक पडणार नाही. शिक्षणमंत्र्यांना खरंच शैक्षणिक बदल करायचाच असेल तर शाळेची गुणवत्ता सुधारा यासाठी शाळांना आवश्यक शैक्षणिक साहित्य पुरवा, वर्गखोल्या बांधा. उगाच राज्याच्या पैशांची उधळपट्टी करू नका, असे देखील रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ‘एक राज्य, एक गणवेश’ यावरून शिक्षणमंत्र्यांना सुनावले.
सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे होत असलेल्या दुर्लक्षावर खंत व्यक्त
‘कुणी सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देता का, लक्ष’ असा डायलॉग म्हणत आज जनतेवर अशी वेळ आल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे, लोकांसमोर असंख्य अडचणी आहेत, पण कोणत्याच यंत्रणेकडून जनतेच्या कुठल्याही मुद्द्यांकडे लक्ष दिले जात नाही. सर्वसामान्यांच्या आयुष्याशी काहीही संबंध नसलेल्या मुद्द्यांना पुढे आणले जात आहे. हे सर्वसामान्यांचे दुर्दैव असल्याचा उल्लेखदेखील रोहित पवार यांनी केला आहे.
नटसम्राटच्या ‘कुणी घर देता का घर’ या डायलॉगप्रमाणे ‘कुणी सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देता का, लक्ष’ असं म्हणण्याची वेळ आज जनतेवर आलीय. लोकांसमोर असंख्य अडचणी असतानाही सरकार, मीडिया आणि राजकीय परिक्षेत्रात मात्र जनतेचे मुद्दे कुठेही दिसत नाहीत. ज्या मुद्द्यांचा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 24, 2023