भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या सात; इमारतीच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात | पुढारी

भिवंडी दुर्घटनेतील मृतांची संख्या सात; इमारतीच्या मालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

भिवंडी : संजय भोईर : भिवंडी वळपाडा येथील वर्धमान इमारत दुर्घटनेत २४ तासाहून अधिक काळ बचावकार्य सुरू आहे. रविवारी सकाळपासून एनडीआरएफने सुरू केलेल्या बचाव कार्यात एका व्यक्तीची वीस तासानंतर जीवंत सुटका केली. या दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर पोहचली आहे.

भिवंडीतील वर्धमान ही तीनमजली इमारत शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून शनिवारी रात्रीपर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले होते. रविवारीही हे बचावकार्य सुरूच असून सकाळी आठच्या सुमारास पहिल्या मजल्यावरील ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या सुनील पिसाळ यांना जीवंत बाहेर काढले. त्यानंतर सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान सुधाकर गवई (३४), प्रमोद चौधरी (२२), त्रिवेणीप्रसाद यादव (४०) यांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आले आहेत. आतापर्यंत दहा जणांना जीवंत बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. तसेच दोघे अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

वर्धमान इमारतीमधील तळ मजला व पहिला मजला या ठिकाणी एम आर के फूड या कंपनीच्या गोदाम मालकाने तब्बल आठ कंटेनर माल भरून ठेवला होता. तर दुर्घटनेच्या दिवशी या ठिकाणी दोन कंटेनर खाली केले होते. येथील एका बॉक्सचे वजन १५ किलो होते. असे २५०० बॉक्स एका कंटेनरमध्ये म्हणजेच एका कंटेनरमध्ये सुमारे ३७.५ टन माल होता. एकत्रित वजन पाहिल्यास सुमारे ३७५ टन माल साठविला होता. या मालाचा वजन सहन करू न शकल्याने अखेर ही इमारत दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.

इमारतीच्या मालकाला घेतले ताब्यात

वर्धमान कंपाऊंड, वलपाडा, मानकोली येथील दुमजली इमारतीच्या मालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भिवंडीचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे म्हणाले की, इमारतीचा मालक इंद्रपाल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी दुपारी ही इमारत कोसळली होती. अपघातानंतर गेल्या ४२ तासांपासून बचावकार्य सुरू आहे. एनडीआरएफ कमांडर दीपक तिवारी यांच्या नेतृत्वाखाली सध्या एनडीआरएफच्या चार टीम कार्यरत आहेत.

Back to top button